श्रीमद् भागवत कथेत पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्री सोनामाय प्रतिष्ठानचा उपक्रम
सेलू : माणसाला दैनंदिन जीवनात पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीमद् भागवतात आहेत. भागवत हे सर्व सांसारिक लोकांकरिता आहे. भक्ती ही मोह, शोक मुक्तीचे माध्यम आहे. आजच्या युगात भक्तीसारखा दुसरा योग्य मार्ग नाही. भक्तीमार्गानेच माणसाचे परमकल्याण होते. सर्व प्रकारचे आचार, कर्म भगवंताला अर्पण करणे म्हणजे भक्ती. भक्तीने मन स्वच्छ, प्रसन्न होते, असे प्रतिपादन पद्मनाभ महाराज व्यास (धाराशिव) यांनी केले.
कुलकर्णी परिवाराच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त श्री सोनामाय प्रतिष्ठान आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे दुसरे पुष्प पद्मनाभ महाराज व्यास यांनी रविवारी शहरातील भक्तितीर्थ साई मंदिरात गुंफले.पुढे बोलताना पद्मनाभ महाराज व्यास म्हणाले की, श्रोता हा विवेकवान असला तरच वक्ता जबाबदारीने अभ्यासपूर्वक बोलतो. चांगल्या गोष्टी ग्रहण करणारा श्रोता असावा. वाईट गोष्टी बाहेर टाकून चांगल्या गोष्टी स्वीकारायला हव्यात. टीव्ही आणि मोबाईल हा सर्व कर्माचा नाश करतो, त्यामुळे सामाजिक माध्यमांचा वापर विवेकीपणे करावा. आळसाचा त्याग करावा. आपल्या पारंपरिक कार्यक्रमात इव्हेंटपेक्षा योग्य विधी, संस्काराला महत्त्व दिले तरच फलप्राप्ती होते, असेही ते म्हणाले. कथेच्या प्रारंभी इशिता अतुल कुलकर्णी हिने अभंग गायन केले.
सूत्रसंचालन अनिल रत्नपारखी यांनी केले. श्रीमद् भागवत कथेस मिलिंद जोशी, सतीश कुलकर्णी, विठ्ठल पडघन, प्रदीप साळेगावकर, रत्नाकर सावरगावकर, महेश खारकर, डी. व्ही. मुळे, प्रदीप सोन्नेकर, विशाल काला, कोलते, दीपक भरड आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





