आंबेडकरी नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सेलू जि.परभणी : महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये आरक्षण अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली आणि अनंत बदर समितीच्या कार्यपद्धती विरोधात सेलू तालुक्यातील समस्त आंबेडकरी व संविधानप्रेमी नागरिकांनी सोमवारी, १५ जून २०२६ रोजी सेलू येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या.
यावेळी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. संविधानाने दिलेल्या एकसंध हक्कांमध्ये विभागणी करून ५९ जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून यामुळे सामाजिक सलोखा व समानतेच्या तत्त्वाला बाधा पोहोचू शकते, असे निवेदनात म्हटले आहे. उपवर्गीकरण व अनंत बदर समिती रद्द करावी, जातीय जनगणना करावी, नोकरीतील अनुशेष भरावा आणि खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे, या मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या धडक मोर्च्यासाठी अशोक अंभोरे, भीमराज गोटे, राहुल जाधव, प्रदीप धापसे, रोहन आकात, विनोद धापसे, उत्तम लोखंडे, विलास कांबळे, प्रा. के. डी. वाघमारे, सुरेश रणखांबे, सुधीर सावंत, गोविंद साळवे, महेंद्र दूधवडे, ऋतिक सावंत, आनंद साळवे, सिद्धार्थ सिरसाट, अक्षय साळवे, धारूजी धाबे, काशीनाथ वाघमारे, शिवाजी वाघमारे व पांडुरंग वाढवे यांनी पुढाकार घेतला.





