जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन, धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू; पूरस्थिती पाहता सैन्य दलाची तुकडी पाचारण; अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार
परभणी : भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी परभणी जिल्ह्याकरिता २७ व २८ सप्टेंबर २०२५ या दिवशी यलो अलर्टचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि निर्माण झालेली पूरस्थिती पाहता नागरिकांनी सुरक्षितस्थळी राहावे, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांनी शनिवारी केले आहे.
धरणांमधून पाण्याचा विसर्ग
जिल्ह्यातील येलदरी व निम्न दुधना धरणे, तसेच ढालेगाव, तारुगव्हान, मुद्गल, दिग्रस हे उच्च पातळी बंधारे आणि झरी, करपरा, मासोळी, मुळी व पिंपळदरी हे निम्न पातळी व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या सर्व जलाशयांमधून सध्या अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा व दुधना या प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नागरिकांनी पर्यटन स्थळे, नदीकाठ तसेच रस्त्यावरून पाणी वाहत असलेल्या ठिकाणाहून धोकादायक प्रवास करणे टाळावे. नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
पूर्णा तालुक्यात तिघांना वाचविण्यात यश
पूर्णा तालुक्यात मौजे चुडावा येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या ३ स्थानिक नागरिकांना अग्निशमन दलाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षित बाहेर काढले आहे. पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथून भारतीय सेनादलाची एक तुकडी पाचारण करण्यात आली आहे. मेजर कमाल हे या तुकडीचे नेतृत्व करत असून, ती लवकरच जिल्ह्यात दाखल होणार आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
जिल्ह्यात पूर परिस्थिती असल्याने नागरिकांनी सुरक्षितस्थळी राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तथापि, काही समाजकंटक रात्री उशिरा पूर परिस्थितीबाबत प्रशासनास चुकीची माहिती देऊन अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्यक्तींविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-२००५ मधील कलम ५४ आणि अन्य प्रचलित तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. नागरिकांनी खोटी माहिती आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. मान्सून कालावधीत आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२४५२ २२६४०० किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ यावर संपर्क साधावा. तसेच, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पवन खांडके यांच्या ९९७५०१३७२६ / ७०२०८२५६६८ या क्रमांकांवरही संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.





