डाक अधीक्षक डॉ.संजय लिये यांचे आवाहन, जिंतूर शहरात ग्रामीण डाक सेवक प्रशिक्षण मेळावा उत्साहात

जिंतूर/प्रतिनिधी : शहरातील शकुंतला बोर्डीकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १४ जानेवारी २०२६ रोजी ग्रामीण डाक सेवक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना परभणी विभागाचे डाक अधीक्षक डॉ. संजय लिये यांनी सर्व नागरिकांनी भारतीय डाक विभागाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या प्रशिक्षण मेळाव्यासाठी जिंतूर, मंठा, येलदरी, बोरी, झरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव उपडाकघरांच्या अंतर्गत येणारे ८० शाखा डाकपाल व उपडाकपाल उपस्थित होते. कार्यक्रमास परभणीचे डाक अधीक्षक डॉ. संजय लिये, जिंतूर उपविभागाचे डाक निरीक्षक बालासाहेब शिंदे, जिंतूरचे पोस्ट मास्तर शेख इर्शाद, राजेश दुकानदार, अभिजीत जोशी आणि भगवान वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
डाक विभागाच्या वतीने एपीटी २.०, पीओएसबी योजना, स्पीड पोस्ट, पार्सल आणि आरएसबीटी सेल अंतर्गत ग्रामीण डाक सेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. लिये यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यालयात टपाल विभागाच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी माहितीपत्रके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नागरिकांनी टपाल विभागाच्या बचत खाते, सुकन्या समृद्धी योजना, टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा, मुदत ठेव खाते (टीडी), आवर्ती बचत खाते (आरडी), राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र, मासिक उत्पन्न योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना अशा विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत मिळणारे शासकीय अनुदान, एटीएम, चेक बुक आणि नेट बँकिंग या सुविधांचाही वापर करावा. पेमेंट बँकेच्या माध्यमातून फोन पे आणि युपीआय सेवा उपलब्ध असून नागरिकांनी जास्तीत जास्त खाती उघडावीत व पार्सल सुविधेचाही लाभ घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव
भारतीय डाक विभागाच्या टपाल जीवन विमा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये राजेश दुकानदार, आशेक सांगळे, घनशाम भांगे, राजेंद्र तुरे आणि सोपान केंद्रे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा टपाल विभागाची बॅग देऊन गौरव करण्यात आला.
नेमगिरी संस्थानास दिनदर्शिका वाटपजिंतूर येथील प्रसिद्ध नेमगिरी संस्थान येथे टपाल विभागाच्या वतीने भेट देऊन विविध योजनांची माहिती असलेली २०२६ ची दिनदर्शिका आणि राम जन्मभूमी स्मृतिचिन्ह संस्थेच्या विश्वस्तांना प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. संजय लिये, बालासाहेब शिंदे, राजेश दुकानदार आणि मंचक जगताप यांची उपस्थिती होती.





