माजी सनदी अधिकारी खोब्रागडे यांचे मत, इंजि. एस.एस. नांदापुरकर राष्ट्रीय परिसंवाद, स्मृती पुरस्कार’ सोहळा उत्साहात
परभणी : भारतीय संविधान हा सर्वंकष विकासाचा आणि परिवर्तनाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हुकूमशाहीकडे झुकलेल्या राज्यकर्त्यांपासून संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी संविधानातील ‘आम्ही भारतीय लोक’ यांनी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केले.
परभणी येथील श्री.शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात २१ सप्टेंबर रोजी विवेकानंद शिक्षण संस्थेद्वारे आयोजित ‘इंजि. एस.एस. नांदापुरकर राष्ट्रीय परिसंवाद तथा स्मृती पुरस्कार’ सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. खोब्रागडे यांनी शासनाकडून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि मागासवर्गीयांचा निधी इतर कामांसाठी वळवला जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांच्या हस्ते झाले. त्यांनी नवीन पिढीला सामाजिक बदलासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात माजी न्यायमूर्ती डी.आर. शेळके यांना ‘इंजि. एस.एस. नांदापुरकर स्मृती राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना श्री.शेळके म्हणाले की, भारतीयांनी अनिष्ट रूढी-परंपरा सोडून संत आणि महापुरुषांनी दाखवलेली विवेकबुद्धी स्वीकारल्यास राष्ट्र समृद्ध होईल.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सुरेश सदावर्ते, इंजि. भीमराव हाटकर, न्यायमूर्ती भूषण काळे, प्राचार्य बी.यू. जाधव, मंगेश नरवाडे, विधिज्ञ अशोक सोनी, बी.एच. सहजराव, प्रा. डॉ. भीमराव खाडे आणि प्रा. डॉ. सुरेश हिवराळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘वृक्षमित्र’ कैलास गायकवाड यांच्या संकल्पनेतून परिसरात वृक्षारोपण करून झाली. त्यानंतर संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. सूत्रसंचालन यशवंत मकरंद यांनी केले, तर प्रास्ताविक सुधीर जाधव यांनी मांडले. अतिथींचा परिचय प्राचार्य सारंग साळवी यांनी करून दिला, तर मानपत्राचे वाचन प्रा. डॉ. सुरेश शेळके यांनी केले. विश्वजीत वाघमारे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक गोविंद नांदापुरकर, बाळासाहेब नांदापुरकर, रवी पंडित, संजीव आढागळे, प्रेमानंद बनसोड, प्रा. अतुल वैराट, आर्यन बनसोडे, ए.पी. राऊत, देवानंद घनसावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





