ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक : चिमुकल्यांसह दिगंबर जैन समाज बांधवांचा मोठा सहभाग
सेलू : सेलूतील दिगंबर जैन समाजाच्या वतीने “दक्षलक्षण महोत्सव”निमित्त सोमवारी, ९ सब्टेबंर रोजी विविध धार्मिक प्रवचने, कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा पालखी मिरवणुकीत चिमुकल्यांसह महिला, तरूण आणि सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सेलू शहरातील जैन मंदिरापासून सकाळी साडेआठच्या सुमारास शोभायात्रा निघाली. सजवलेल्या पालखीतून भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्यांने पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. ढोल, ताशांच्या गजराने व भगवान महावीरांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.
दक्षलक्षण पर्वानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंडित विराग शास्त्री, जबलपूर, पंडित सम्यक जैन, मुंबई यांचे प्रवचन दहा दिवसांमध्ये “मेरी भावना” या विषयावर उद्बोधक, प्रेरणादायी प्रवचन संपन्न झाले. सकाळी अभिषेक, सामूहिक पूजन, प्रवचन तसेच दुपारी पंडित सम्यक जैन यांची कक्षा, प्रवचन संपन्न झाले. संध्याकाळी पाठशाला, आरती, प्रवचन व धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. जलाभिषेकांसह स्वाध्याय, ध्वजारोहण,अभिषेकपूजन विविध धार्मिक विधी उत्सव ,भजन संध्या, सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. सामुदायिक महाप्रसादचा सर्वांनी लाभ घेतला. महोत्सव यशस्वी करण्यासाठी समाजाच्या सर्व श्रावक ,श्राविकांनी तसेच युवा वर्गानी परीश्रम घेतले. बहूमंडल, महिला मंडळ, पाठशाला मंडळाच्या वतीने विविध स्पर्धा ,सांस्कृतिक कार्यक्रम ,नृत्य ,नाटिका घेण्यात आल्या . उत्सवासाठी सेलू शहरातील सकल जैन समाज बांधवांनी पुढाकार घेतला.
दक्षलक्षण पर्वाची तत्त्वे
दर्शनी भागात जैन धर्माच्या तत्वे ठळकपणे लक्ष वेधून घेत होती. जैन धर्माची तत्त्वे सांगितलेली आहेत. उत्तम अकिंचन्य, उत्तम त्याग, उत्तम तप, उत्तम संयम, उत्तम शौच, उत्तम आर्जव, उत्तम मार्दव, उत्तम क्षमा. प्रत्येक व्यक्तीने या तत्त्वांचे पालन करून जीवनाचा खरा उद्देश साध्य केला पाहिजे, असा संदेश भगवान महावीरांनी विश्वातील संपूर्ण मानवजातीला दिला आहे.





