शिवसेना उबाठा पक्षाचे परभणीत जनआंदोलन; रखडलेल्या विकासकामांवरून सरकारवर तोफ
परभणी : मराठवाड्यात पावसाने महिन्याहून अधिक काळ ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ सप्टेंबर रोजी “मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा” जनआंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त केवळ पोकळ घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात सिंचन, आरोग्य व शिक्षणाचा अनुशेष कायम असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे मोठे नुकसान झाले असून दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा अशी मागणी त्यांनी लावून धरली. तसेच आरक्षण प्रश्नावरून सरकार मराठा व धनगर समाजाकडे केवळ मतपेटी म्हणूनच पाहत असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार मीरा रेंगे, महापौर सय्यद इकबाल, डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे, अंबिका डहाळे, माजूलाला, अरविंद देशमुख, शिवलिंग बोधणे, प्रभू जयस्वाल आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणीतील समांतर पाणीपुरवठा, शासकीय रुग्णालय, सिंचन प्रकल्प, रेल्वे दुहेरीकरण व जिंतूर बायपास यांसारख्या रखडलेल्या कामांचा जाब विचारत, हक्काचा विकास निधी मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा आमदार दानवे, डॉ.पाटील आणि आंदोलकांनी दिला.





