१५ ते २१ ऑगस्टदरम्यान विविध उपक्रम, २१ ऑगस्टला परभणीत ‘महा वॉकथॉन—वॉक फॉर वॉटर’
परभणी, दि.१४ : राज्यातील जलसंधारण चळवळीला व्यापक दिशा देणारे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्याची प्रेरणा घेत दि. १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत परभणी जिल्हयात जलसंधारण सप्ताह, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे. दि. २१ ऑगस्ट हा सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिवस असून हा दिवस ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकथॉन—वॉक फॉर वॉटर’ उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे क्रीडा संकुल असा सुमारे ३ किलोमीटरचा हा वॉकथॉन असणार आहे. तसेच या दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. जलसंधारण सप्ताह यशस्वी करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.जलसंधारण सप्ताह व जलसंधारण अभियान याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. क.ज. कुच्चे व पत्रकार उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, मृदसंधारण व जलसंधारण हे केवळ शेतीपुरते मर्यादित नसून शेती, पर्यावरण, जैवविविधता आणि शाश्वत विकासाचा पाया आहे. जलसंधारण सप्ताहात जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात येणार आहे. वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम, अमृत सरोवर भेट, माती नाला बांध व संयुक्त गाळीव बंधाऱ्यांचे जलपूजन, शाळांमध्ये शोषखड्डे तयार करणे, चित्रकला व पोस्टर स्पर्धा, जलमित्र-जलदूत घोषित करणे, जलसंधारण कामांचे भूमिपूजन व लोकार्पण, नाला-तलाव-विहीर स्वच्छता आणि नाला खोलीकरणाच्या कामांना भेटी असे उपक्रम राबविले जातील.तसेच युवा पिढीला जलसंधारणाच्या कामाशी जोडणे हा जलसंधारण सप्ताहाचा महत्त्वाचा भाग आहे. सप्ताहात महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून डिजिटल तसेच प्रत्यक्ष सहभाग वाढविण्यात येणार आहे. रिल स्पर्धा, चित्रकला, पोस्टर, निबंध, वाद-विवाद, जलमित्र-जलदूत उपक्रम, वृक्षारोपण आणि प्रत्यक्ष जलसंधारण कामांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.जलसंधारण सप्ताह कार्यक्रमाची सविस्तर रुपरेषा पुढील प्रमाणे आहे. दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या हस्ते जलसंधारण सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी व जलसंधारणाची शपथ घेतली जाणार आहे. ‘Reel for Soil and Water Conservation’ या जिल्हास्तरीय स्पर्धेचा शुभारंभ, शालेय विद्यार्थ्यांची नोंदणी, अभियानाच्या लोगोचे अनावरण तसेच जलसंधारण रथास हिरवी झेंडी दाखवून अभियानाला सुरुवात केली जाणार आहे.दि. १६ ऑगस्ट रोजी जलसंधारणाच्या कामांना पर्यावरण संवर्धनाची जोड देत परभणी शहरातील विविध ठिकाणी तसेच शासकीय कार्यालयांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात येईल. यासोबतच नागरिकांच्या लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ व हरित ठेवण्याचा संदेश देण्यात येईल. दि. १७ ऑगस्ट रोजी जलसंधारणाच्या प्रत्यक्ष कामांना चालना देण्यासाठी अमृत सरोवरांना भेट देण्यात येईल. तसेच माती नाला बांध व संयुक्त गॅबियन बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात येईल. शाळांमध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी शोषखड्डे तयार करण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात येईल. स्थळ : मौजे दामपुरी व बेलवाडी, ता. गंगाखेड.दि. १८ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारणाची जाणीव निर्माण करण्यासाठी ‘पाणी बचत’ व ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ या विषयांवर चित्रकला व पोस्टर स्पर्धा घेण्यात येतील. जलसंधारणाच्या कामात सक्रिय योगदान देणाऱ्या युवकांना ‘जलमित्र’ व ‘जलदूत’ म्हणून घोषित करण्यात येईल. तसेच मृद व जलसंधारणाच्या विविध कामांचे भूमिपूजन, लोकार्पण व जलपूजन करण्यात येईल. यासोबतच अमृत सरोवराला भेट देऊन जलसंधारणाच्या कामांची पाहणी करण्यात येईल. स्थळ : मौजे निलज गणेशनगर व मौजे माणकेश्वर, ता. जिंतूर.दि. १९ ऑगस्ट रोजी पर्यावरण व जलसंधारणाचा परस्पर संबंध अधोरेखित करण्यासाठी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येईल. त्याचबरोबर नागरिकांच्या लोकसहभागातून नाला, तलाव व विहिरींची स्वच्छता करण्यात येऊन जलस्रोतांचे संवर्धन व पुनरुज्जीवन करण्याचा संदेश दिला जाईल. स्थळ : मौजे माणकेश्वर, ता. जिंतूर.दि. २० ऑगस्ट रोजी नाला खोलीकरणाच्या सुरू असलेल्या कामांना भेट देऊन त्याची पाहणी करण्यात येईल. तसेच शाळांमध्ये शोषखड्डे तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात येईल. विद्यार्थ्यांना पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे आणि भूजल पुनर्भरणाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजावून देण्यात येईल. स्थळ : रामेटाकळी व मुदगल, ता. पाथरी.दि. २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात येणार आहे. परभणी येथे ‘महा वॉकथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयापासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलापर्यंत वॉकथॉनद्वारे ‘पाणी वाचवा, जलसंधारण करा’ हा संदेश जनमानसात पोहोचविण्यात येईल. यानंतर मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ, मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, तसेच बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणत प्रत्येकाने या अभियानात सहभागी व्हावे आणि परभणीला जलसमृध्द करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.





