कवी इंद्रजीत भालेराव यांचे प्रतिपादन, अक्षर साहित्य संमेलनाचा समारोप
सेलू : आज मराठी साहित्यात डॉ. आसाराम लोमटे मान्यताप्राप्त मराठी लेखक म्हणून सुप्रसिद्ध आहेत. ते सेलू शहराचे नूतन महाविद्यालयाचे विद्यार्थी असून त्यांचा सेलूकारांनी अक्षर साहित्य संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून केलेला सन्मान मोलाचा आहे, असे गौरवोद्गार कवी इंद्रजीत भालेराव यांनी काढले.मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहकार्याने रविवार, १६ नोव्हेंबर रोजी सेलू शहरातील साई नाट्य मंदिर येथे अक्षर प्रतिष्ठान आयोजित अक्षर जिल्हास्तरीय साहित्य संमेलन समारोप झाला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी प्रा.भालेराव बोलत होते. मंचावर संमेलनाध्यक्ष डॉ.आसाराम लोमटे आणि माया लोमटे यांच्यासह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य डॉ.राजेश गायकवाड, लेखक प्रा.यादव गायकवाड, गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, उदय जाधव, संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, स्वागताध्यक्ष सर्जेराव लहाने, सरचिटणीस प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, कार्याध्यक्ष तथा कथाकार राम निकम आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना श्री.भालेराव म्हणाले,” संमेलनाध्यक्षांनी केलेले वैचारिक भाषण भूमिका घेऊन केलेले आहे. कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लेखक म्हणून संमेलनाध्यक्षांचे विचार महत्त्वाचे आहेत”, असे सांगून पुढे ते म्हणाले की,” या संमेलनाची ‘ अक्षरायण ‘ ही स्मरणिका अत्यंत वाचनीय झालेली आहे. नूतन शिक्षण संस्था आणि स्वागताध्यक्षांनी या संमेलनाचे नेटके आयोजन करून या संमेलनात कवी संमेलन, परिसंवाद, कथाकथन, निसर्गचित्र प्रदर्शन, गझल गायन आणि मुलांसाठी नाटिका सादरीकरण आणि इतर उपक्रमांची केलेली अभिव्यक्ती अव्वल दर्जाची ठरलेली आहे. या संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाने वाचकांना ‘वाचनाचे सांगाती’ केलेले आहे. सर्वसमावेशकता आणि व्यापकता या अर्थाने हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरलेले आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. आसाराम लोमटे म्हणाले की,” मी निश्चित भूमिका घेऊन लेखक म्हणून जगतो. सामाजिक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न माझ्या साहित्यातून उमटलेले आहेत. सेलूकारांनी मराठीभाषेची कळवळ जपण्यासाठी हे संमेलन सर्व अर्थाने यशस्वी केलेले आहे. तीन पिढ्यांना साधणारे हे संमेलन अविस्मरणीय आहे. पूर्वज, समकालीन आणि भविष्यकालीन लेखक आणि कवींना आणि कलावंतांना सामावून घेणारे हे संमेलन सामाजिक अभिसरणाचे महत्त्वाचे अभिकर्ता ठरलेले आहे. ” प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन शेख मौजम यांनी केले. डॉ.शरद ठाकर यांनी आभार मानले. संमेलन यशस्वी करण्यासाठी अक्षर प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सुरेश हिवाळे, बाळू बुधवंत, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, विजय चौधरी, सच्चिदानंद डाखोरे, अजित मंडलिक आदींनी परिश्रम घेतले.





