वालूर येथे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात
परभणी, दि.१३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन शेतीला पूरक पशुपालन व्यवसायातून उत्पन्न वाढ साधावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी गुरुवारी, १३ ऑगस्ट २०२६ रोजी वालूर येथे केले.
वालूर येथे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, गटविकास अधिकारी उदय जाधव, तहसीलदार शिवाजी मगर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मनोज घाटे, सहायक आयुक्त डॉ. दीपक धर्माधिकारी, जिल्हा परिषद सदस्य साक्षी साडेगावकर, डॉ. आशिष डख, गजानन डोंबे, गणेश मुंढे, शिवराम कदम, दीना मगर, सरपंच संजय साडेगावकर, पशुधन डॉ. प्रकाश सावने, सुनील हट्टेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, कृषिप्रधान देशात बहुतांश कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. शेतीसोबत पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि शेळीपालन यांसारखे पूरक व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. शेळीच्या दुधापासून विविध दुग्धजन्य पदार्थ, चीज, तूप आदी मूल्यवर्धित उत्पादने तयार करून अतिरिक्त उत्पन्न मिळवावे. यासाठी पशुपालक उद्योजकांनी योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी पशुधन व्यवसायातून आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा घेण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी आयोजकांना दिल्या.
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ९५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या योजनेसाठी १५ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू होणार असून, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना पालकमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत परभणी जिल्ह्यात पहिल्या यादीत एक लाख ७२ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झाली असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत असल्याचे सांगितले. लवकरच तालुक्यात ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार असून जिल्ह्यात ‘ड्रोन दीदी’ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेले शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात शेतकऱ्यांचे ४३ कोटी रुपयांचे वीजबिल माफ करण्यात आले असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्त्यांची कामेही करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात ‘सिल्क आणि मिल्क’ योजना राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच आगामी काळात सुमारे बाराशे कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून, त्यातून जिल्ह्यात उद्योगांना चालना मिळेल. तसेच जिल्ह्यात औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय वाढवावा : जिल्हाधिकारी
संजयसिंह चव्हाणजिल्ह्यातील शेतकऱ्यांना पशुपालनातून नियमित उत्पन्न मिळविण्याची मोठी संधी आहे. अल्पभूधारक, मध्यम भूधारक तसेच अधिक शेती असलेल्या शेतकऱ्यांनी शेळीपालन, गोपालन आणि डेअरी व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी कार्यशाळेला उपस्थित शेतकऱ्यांना केले. चारा, पशुखाद्य, दूध उत्पादन, दुग्धजन्य पदार्थ, मांस उत्पादन आणि बाजारपेठ यांचा योग्य समन्वय साधल्यास पशुधन व्यवसाय अधिक फायदेशीर करता येतो. शेतीपासून पशुधनासाठी चारा आणि पशुधनापासून शेतीसाठी खत उपलब्ध होते. त्यामुळे एकात्मिक शेतीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. सोयाबीन, तूर आदी पिकांपासून चारा तसेच तुतीच्या पाल्यापासून प्रथिने मिळविता येतात. पशुखाद्य, स्वच्छ पाणी, पोषण आणि जनावरांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास उत्पादन व नफा वाढू शकतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तरुणांनी आणि महिलांनी उच्चशिक्षण घेऊन केवळ नोकरीसाठी शहराकडे स्थलांतर करण्याऐवजी गावातच पशुसंवर्धनावर आधारित व्यवसाय उभारावेत. नोकरी मागणारे होण्याऐवजी नोकरी देणारे उद्योजक व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी केले. शेतीला पूरक व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चितच मोठे उद्योजक होता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दीपक धर्माधिकारी यांनी केले. यावेळी डॉ. श्रीनिवास कारले यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसह राज्यातील पशुउद्योजकांसाठी उपलब्ध विविध योजनांची माहिती दिली. ऑनलाइन अर्जप्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अनुदान, अनुदान वितरण तसेच लाभार्थी हिस्सा याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.उद्योग उभारणीसाठी बँकेतील वित्तपुरवठ्याबाबत आरसेटीचे वित्तीय सल्लागार सुनील हट्टेकर यांनी पशुपालन योजनांसाठी बँकेमार्फत निधीपुरवठा केला जात असून, शेतकरी उद्योजकांनी त्यांचा सिबील स्कोअर चांगला ठेवावा, असे सांगितले.कार्यशाळेदरम्यान काही शेतकरी उद्योजकांना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. लोकसहभागातून कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी आयोजक व सहभागींचे आभार मानले. तत्पूर्वी पालकमंत्री बोर्डीकर यांनी वालूर येथील कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींच्या तिरंगा रॅलीला हिरवी झेंडी दाखवली.





