सेलू तालुका दबाव गटाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन, मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
सेलू जि.परभणी : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मूग, सोयाबीन, कापूस यांसारख्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात सर्वत्र पाणी साचले असून, धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आले आहेत. यामुळे परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांतील शेतकरी हवालदिल झाले आहेत.सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले असले तरी, दसरा आणि दिवाळी हे सण जवळ आले आहेत. शेतकऱ्यांचे नगदी पीक पूर्णपणे वाया गेले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामान खात्याने पुढील काळातही मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.त्यामुळे, शासनाने तातडीने दिवाळीपूर्वी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयेप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सेलू तालुक्यासह मराठवाड्यातील कोणतेही महसूल मंडळ मदतीपासून वंचित राहू नये, असा आग्रह या निवेदनातून करण्यात आला आहे. या निवेदनावर ॲड. श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, ॲड. देवराव दळवे, ॲड. योगेश सूर्यवंशी, सतीश काकडे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.





