शेतीचं मोठं नुकसान
सेलू : परभणी जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे सेलू तालुक्यातील सोन्ना गाव पाण्याखाली गेले आहे. गावाच्या आजूबाजूला असलेल्या दुधना नदीला पूर आल्याने तसेच लोअर दुधनातून पाण्याचा मोठा विसर्ग झाल्याने संपूर्ण गावाचा संपर्क तुटला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पुनर्वसनाची मागणी दुर्लक्षित
गेल्या अनेक वर्षांपासून सोन्ना गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. वालूर-मानवत रस्त्यापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव चहूबाजूने पाण्याने वेढले गेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
तत्काळ मदतीची मागणी
या अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांनी शासनाकडून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





