
पेन्शनर्स असोसिएशनचा सेलूत स्तुत्य उपक्रम
सेलू : भारताच्या इतिहासात महिलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने ‘आडगळीतील सूर्य’ ही नाटिका सादर करून वीर मातांच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला.
या स्तुत्य उपक्रमाला शहरांतील रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. साई नाट्यगृह येथे आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन वैशाली मिलिंद सावंत यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून नयन साईराज बोराडे, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी तर संयोजिका म्हणून रोहिणी अनिल कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना वैशाली सावंत म्हणाल्या की, महिला दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून तो कर्तृत्वाचा संदेश देणारा दिवस आहे. जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई यांसारख्या थोर महिलांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तृत्व सिद्ध केले. सावित्रीबाईंनी शिक्षणाची दारे उघडली, तर जिजामातांनी शिवरायांसारखे राजे घडवले. आजच्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजाला सक्षम करत आहेत, याचे श्रेय आपल्या देशातील वीर मातांनाच जाते.कार्यक्रमात नयन बोराडे यांनी कलावंतांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी अध्यक्षीय समारोप करताना कलावंतांचे कौतुक केले.
प्रास्ताविक रोहिणी कुलकर्णी यांनी केले, सूत्रसंचालन हेमलता देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन हेमलता जोशी यांनी केले. यावेळी शहरातील नवनिर्वाचित महिला नगरसेविका आशा पठाडे, अनुपमा देवधर, शांताबाई रघुवंशी, शिला काजळे व सुनीता काकडे यांचा सत्कार करण्यात आला.सुरेश झिंजुर्के लिखित आणि प्रा. ए. डी. कुलकर्णी व रोहिणी कुलकर्णी यांच्या संकल्पना व दिग्दर्शनातून साकारलेली ही नाटिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यात झाशीची राणी, इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, बहिणाबाई चौधरी, राजमाता जिजाऊ, कल्पना चावला आणि लता मंगेशकर यांचा इतिहास वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला.नाटिकेच्या कथानकात एका मोडकळीस आलेल्या संग्रहालयात प्रवेश करणारी वृत्त निवेदिका आणि तेथील बोलणारे पुतळे यांच्या संवादातून आजच्या सोशल मीडियाच्या युगातील वास्तव मांडले गेले. केवळ फोटो काढून ते पोस्ट करण्यापेक्षा महापुरुषांचा इतिहास अभ्यासणे गरजेचे असल्याचा संदेश यातून देण्यात आला. संग्रहालयात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या दोन चोरांचे मनपरिवर्तन या वीर मातांच्या पुतळ्यांनी कसे केले, याचे प्रभावी चित्रण नाटकात दिसले.या नाटिकेत पद्मजा खारकर, पुजा जोशी, संज्ञा खारकर, मिरा देशमुख, सोनाली कुबरे, सरिता उमरीकर, सीमा अष्टीकर, मंजुषा बोराडे, रेणुका बोठे, सीमा काळबांडे, रवी कुलकर्णी व रवी मुळावेकर तसेच बाल कलाकार हर्षदा मोगल, स्वरा देशपांडे, ऋतुजा राठोड व ईश्वरी कुलकर्णी यांनी भूमिका साकारल्या.दरम्यान, सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या सेलूत कार्यक्रमांच्या वेळेचे गणित कोलमडत असल्याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली. सायंकाळी ५:३० ची वेळ असताना नाटक ७ वाजता सुरू झाले. संयोजकांनी वेळेचे महत्त्व ओळखून कार्यक्रम वेळेवर सुरू करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले.





