महामंडलेश्वर स्वामी शिवगिरिजी यांचे प्रतिपादन, सेलूमध्ये सहस्रामृत प्रवचन सोहळा उत्साहात

सेलू : संतांचे आशीर्वाद हे कल्पवृक्षासारखे फलदायी असतात. ज्या घरात वडीलधाऱ्यांचा सन्मान होतो, तिथेच खऱ्या अर्थाने देवपण वास करते. आजच्या काळात भौतिक सुखापेक्षा आई-वडिलांची सेवा आणि त्यांना दिलेला आनंद हीच सर्वात मोठी तीर्थयात्रा आहे, असे आशीर्वचनपर प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे कृपा पात्र शिष्य आणि पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरिजी महाराज (निफाड) यांनी केले.
सेलू (जि.परभणी) येथील श्री साईबाबा मंदिरात स्वाती व बाबासाहेब हेलसकर आणि परिवाराच्या वतीने गुरुवारी, २३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित पार्वती व शंकरराव हेलसकर यांचा सहस्रचंद्रदर्शन आणि विजया व दत्तात्रय गोरे यांच्या अमृत महोत्सव यानिमित्त आयोजित सहस्रामृत सोहळ्यातील संगीतमय प्रवचनात ते बोलत होते. या सोहळ्याद्वारे प्रथमच आईवडिल आणि सासू-सासरे या दोन्ही कुटुंबांतील जेष्ठांप्रति व्यक्त केलेल्या या आगळ्यावेगळ्या कृतज्ञतेचे महाराजांनी विशेष कौतुक केले. मीरा नारायण हेलसकर, छाया दिलीप हलगे, अश्विनी अजित गोरे, अर्चना अमोल झोटिंग, नातेवाईक आणि परिवाराने मान्यवरांचे स्वागत केले. स्वामी शिवगिरिजी पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृती ही अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी आहे. त्यामुळे वाढदिवसाला मेणबत्त्या विझवून अंधार करण्यापेक्षा, जितकी वर्षे पूर्ण झाली आहेत तितके दिवे प्रज्वलित करून मांगल्याचा उत्सव साजरा करावा.
यावेळी त्यांनी मार्कंडेय ऋषींचा दृष्टांत देत सांगितले की, संतांच्या ‘आयुष्यमान भव’ या एका आशीर्वादामुळे साक्षात मृत्यूवरही विजय मिळवता येतो. जो मनुष्य शुद्ध मनाने ईश्वराचे नामस्मरण करतो आणि पालकांची सेवा करतो, त्याचे रक्षण स्वतः भगवंत करतो.घर म्हणजे केवळ भिंती नसून तिथे जपले जाणारे संस्कार आणि प्रेम महत्त्वाचे असते, हे या सोहळ्याने सिद्ध केले आहे. जीवनात कुणाचेही वाईट न चिंतता आनंदाने जगण्याचा संदेशही महाराजांनी यावेळी दिला. गायन व संगीत साथ बाबाजी भजन सेवा मंडळाने केली.
प्रारंभी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच स्वामी शिवगिरी महाराजांचे शाल, पुष्पहार आणि रजत बिल्व पत्राचे सन्मानचिन्ह देऊन सद्गुरू पूजन आणि श्रीराम गिरि महाराज, बळीराम महाराज, सुरेश महाराज, वाल्मिकी महाराज, त्र्यंबक महाराज आणि साधूंचा सन्मान करण्यात आला. सान्वी हेलसकर हीने आजीआजोबाच्या आठवणी सांगितल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शंकरराव हेलसकर व दत्तात्रय गोरे दाम्पत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रास्ताविक बाबासाहेब हेलसकर, सूत्रसंचालन ऐश्वर्या तुषार उदगे-शिलवंत यांनी केले. कार्यक्रमास बाबाजींचे भक्त मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक, महिला भाविकांची मोठी उपस्थिती होती. आरतीनंतर भोजनप्रसादाने सांगता झाली.
यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्रा.प्रकाश कुरूंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजनात अशोक लिंबेकर, बन्सीधर पद्मावत, कैलास मलवडे, अनिल रत्नपारखी, महादेव आगजाळ, सुभाष मोहकरे, किशोर कटारे, नूतन विद्यालय परिवार, समाज बांधव, शिक्षक मित्र मंडळ यांसह अनेक भाविकांनी परिश्रम घेतले.
सजीव देखाव्याने वेधले लक्ष
सोहळ्यात स्वामी शिवगिरी महाराजांचे ८१ सुवासिनींनी औक्षण केले. अक्षरा पवार, अनया ढाकणे, सानिका गायकवाड, रागिणी वाघमारे यांनी श्री शंकर पार्वती, श्रीगणेश, श्री कार्तिकेय आदींचा सुंदर सजीव देखावा सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शशिकांत देशपांडे आणि भालचंद्र गांजापूरकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
ग्रंथ, लेखन साहित्याचे वाटप
या सोहळ्यात वेदमूर्ती कमलाकर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी, दीपोत्सव तसेच जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथ व लेखनवह्यांची आणि गुळ, शर्करा तुला करण्यात आली. भाविकांना ग्रंथांचे वाटप करण्यात आले, तर सामाजिक बांधिलकी जपत लेखनवह्यांचे वाटप विद्यार्थ्यांना केले जाणार आहे, असे या वेळी नमूद करण्यात आले.





