मध्यस्थी ही वाद मिटवून सौहार्द निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम : प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. एम. सादराणी
परभणी : मुख्य मध्यस्थी देखरेख समिती, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रमाचा नुकताच शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एम. सादराणी यांच्या हस्ते करण्यात आले.
न्यायाधीश आर. एम. सादराणी या वेळी बोलताना म्हणाले की, मध्यस्थी ही केवळ वाद मिटवण्याची प्रक्रिया नसून दोन पक्षांमध्ये संवाद, समन्वय आणि सौहार्द निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे. न्याय अधिक जलद, सुलभ आणि समाधानकारक पद्धतीने मिळवून देणारी व्यवस्था म्हणून मध्यस्थीकडे पाहणे गरजेचे आहे.या प्रसंगी एमसीपीसी (नवी दिल्ली) येथील वरिष्ठ प्रशिक्षक तथा सिटी सिव्हिल जज व प्रशासकीय न्यायाधीश संजीव भालेराव, एम. के. जाधव, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस. टी. अडकिने आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.८ ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित या कार्यशाळेत परभणी व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ४० वकिलांनी सहभाग नोंदवला आहे. या कार्यशाळेत मध्यस्थी प्रक्रियेबाबत सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. युसुफझाईन नहीन यांनी केले, तर आभार ॲड. रासवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




