‘दिवस तुझे फुलतांना’ कार्यशाळेत रत्नाकर महाजन यांचे प्रतिपादन
परभणी : वयात आलेल्या मुलींनी केवळ बाह्य स्वरूपात न अडकता अंतर्मनात डोकावणे महत्त्वाचे आहे. कारण आत्मपरीक्षण आणि आत्मजाणीव हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन योग अध्यापक रत्नाकर महाजन (बी.जे.एस.) यांनी केले.
सेलू शहरासह तालुक्यातील आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना सक्षम व सजग बनवण्याच्या उद्देशाने प्रथमेश राठी मित्रमंडळाच्या वतीने ‘दिवस तुझे फुलतांना’ या प्रबोधनपर कार्यशाळेचे आयोजन १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सेलू येथे करण्यात आले होते. महाजन यांनी आत्मविश्वास, स्वसंरक्षण, मैत्री, प्रोत्साहन, स्वतःची ओळख, निवड व निर्णय, तसेच संवाद व नातेसंबंध यांसारख्या विषयांवर मुलींशी मनमोकळा संवाद साधत मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनात महाजन यांनी, ‘दिवसभर केलेल्या कामासाठी स्वतःची पाठ थापटता आली पाहिजे’ आणि ‘भविष्यात आपली ओळख आई-वडिलांची ओळख निर्माण करणारी असावी,’ असा प्रेरणादायी संदेश मुलींना दिला. ‘माझ्या नावाचा अर्थ काय?’, ‘मला आनंद कशात मिळतो?’ माझ्यातील चांगले वाईट गुण कोणते? मी काय सुधारणा करू शकते ? अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून मुलींना बोलते करीत त्यांना अंतर्मुख होण्यास प्रेरित केले.
या कार्यक्रमाला नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायणजी लोया, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, शारदा विद्यालयाचे अध्यक्ष रामनाना खराबे, सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया कोठेकर, सचिव ललिता गिल्डा, कांचन बाहेती, पुष्पा तोष्णीवाल, विवेकानंद प्राथमिक शाळेचे हरिभाऊ चौधरी आणि उपेंद्र बेल्लूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक आयोजक प्रथमेश राठी यांनी केले, तर सूत्रसंचालन परवेज सौदागर यांनी केले. अभिजित राजूरकर, आशीष लोढा, नारायण शर्मा, मुश्ताक घौरी, शैलेश भराडिया आणि नीलेश गौरी यांनी कार्यशाळेसाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थिनींसह पालक महिल मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





