पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रतिपादन, ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात

परभणी, दि. १५ : परभणी जिल्ह्याची वेगाने विकासाकडे वाटचाल सुरू असून, शेती, शिक्षण, उद्योग, ऊर्जा, आरोग्य यांसह अनेक क्षेत्रांत जिल्ह्याची प्रगती होत आहे. आगामी काळातही विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून परभणी विकासाच्या वाटेवर पुढेच राहील, अशी ग्वाही राज्याच्या सार्वजनिक आरोग्य, कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात त्या बोलत होत्या.
विकासाच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर, जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी शुभेच्छापर संदेश दिला. यावेळी खासदार फौजिया खान, आमदार राहुल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाल्या की, स्वातंत्र्य दिन हा आपल्या सर्वांसाठी एक अमूल्य राष्ट्रीय सण आहे. देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या वीरपुत्रांना त्यांनी नमन केले आणि त्यांच्या योगदानाला उजाळा दिला. ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात परभणीकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले.
वीज आणि आरोग्य सुविधांमध्ये वाढ
जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती चांगली असल्याने जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे आणि पीक परिस्थितीही समाधानकारक आहे. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने’मुळे शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळत आहे, तसेच ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेचाही लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’द्वारे घरांवर सौर पॅनेल बसवण्यावर त्यांनी भर दिला.
आरोग्य सेवा मजबूत करण्यावर भर देत, परभणी येथे १०० खाटांचे कर्करोग रुग्णालय सुरू करण्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. तसेच, हिमोफिलिया रुग्णांसाठी लागणारे हेमलिब्रा इंजेक्शन आता जिल्हा रुग्णालयातच उपलब्ध झाले आहे, ज्यामुळे रुग्णांना बाहेर जावे लागणार नाही. ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ९० हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महिला बचत गट सक्षम करून ‘लखपती दीदी योजना’ आणि ‘आदिशक्ती अभियान’ राबविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू करण्यात आले असून, याद्वारे गावांमध्ये विकासाची स्पर्धा निर्माण होईल.
याचबरोबर, ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत २ लाख ५९ हजार घरांना नळजोडणी देण्यात आली आहे आणि उर्वरित जोडण्या लवकरच पूर्ण होतील. समाजातील मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. क्रीडा विकासासाठी २५ एकर जागा मिळविण्याकरिता प्रयत्न सुरू असून, ‘गाव तेथे क्रीडांगण व व्यायामशाळा’ उभारण्यासाठी २८० लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
गौरव आणि उपक्रमांचा शुभारंभ
यावेळी पालकमंत्री बोर्डीकर यांनी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात लघुउद्योजक, राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त खेळाडू, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी-कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. ‘आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार’ विजेत्या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला आणि शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. तसेच, उच्च रक्तदाब व मधुमेह रुग्णांना आशा स्वयंसेविकामार्फत घरपोच औषध किट देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आ




