राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान वादळी पाऊस; पिकांच्या सुरक्षिततेसाठी शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये येत्या १७ ते २० मार्च दरम्यान प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या सध्याच्या निष्कर्षानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दिसून येऊ शकते. या काळात विजांचा कडकडाट, वेगवान वारे आणि पावसासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. १८ ते २० मार्च या कालावधीत या हवामान बदलांची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असल्याने शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे. वादळी पाऊस आणि संभाव्य गारपिटीमुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा किंवा तो ताडपत्रीने व्यवस्थित झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. हवामानाची स्थिती पाहूनच शेतीकामांचे नियोजन करावे आणि पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.





