रानभाज्यांचे प्रदर्शन व थेट विक्रीसह शेतकरी चर्चासत्र; ३० गुणवंत शेतकरी गटांचा होणार गौरव
फुलचंद भगत, वाशिम : ग्रामीण आणि दुर्गम भागात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या पारंपरिक रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांना त्यांच्या पौष्टिक व औषधी गुणधर्मांची ओळख करून देण्यासाठी वाशिम येथे १४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाटणे लॉन, वाशिम येथे हा महोत्सव होणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता होणार आहे.यावेळी रानभाजी प्रदर्शन व विक्री, शेतकरी चर्चासत्र तसेच ‘फार्मर ग्रुप लीग’ स्पर्धेतील गुणवंत शेतकरी गटांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
रानभाज्यांचे प्रदर्शन अन् थेट विक्री पावसाळ्यात ग्रामीण भागात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांमध्ये अनेक पोषक घटक आणि औषधी गुणधर्म आढळतात. मात्र, आधुनिक जीवनशैलीमुळे पारंपरिक रानभाज्यांचा आहारातील वापर कमी होत चालला आहे. ही पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्यासोबतच रानभाज्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.जिल्ह्याच्या विविध भागांतून आणलेल्या रानभाज्या नागरिकांना पाहता व खरेदी करता येणार असून, स्थानिक शेतकरी व महिला बचत गटांना आपल्या उत्पादनांची थेट विक्री करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचे व्यासपीठमहोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात कृषी तज्ज्ञांकडून आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, पीक व्यवस्थापन तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.याशिवाय शेतकऱ्यांना आपल्या शेतीविषयक अडचणी, प्रश्न आणि शंकाही तज्ज्ञांसमोर मांडता येणार असून त्यांचे निरसन करण्यात येणार आहे.*‘फार्मर ग्रुप लीग’मधील गुणवंतांचा गौरव*शेतकरी गटांनी संघटितपणे काम करून उत्पादन खर्च कमी करावा, सामूहिक उपक्रम राबवावेत आणि शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी, यासाठी कृषी विभागामार्फत ‘फार्मर ग्रुप लीग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांचा महोत्सवात सन्मान करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील उत्कृष्ट १० शेतकरी गटांचा गौरव करण्यात येणार असून, वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा या सहाही तालुक्यांतील प्रत्येकी पाच उत्कृष्ट शेतकरी गटांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. अशा प्रकारे एकूण ३० शेतकरी गटांना गौरव व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.शेतकरी, नागरिकांनी सहभागी व्हावेहा महोत्सव केवळ रानभाज्यांच्या प्रदर्शनापुरता मर्यादित न राहता शेतकरी, ग्राहक, महिला बचत गट आणि कृषी क्षेत्रातील विविध घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधव, नागरिक तसेच महिला बचत गटांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाहा यांनी केले आहे.रानभाज्यांची ओळख, थेट विक्री, कृषीविषयक मार्गदर्शन आणि गुणवंत शेतकरी गटांचा गौरव अशा विविध उपक्रमांनी वाशिममध्ये होणारा हा महोत्सव शेतकरी व नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.





