सेलू तालुका दबाव गटाचा महावितरणला इशारा
१५ जुलै २०२६ पर्यंत कार्यवाही न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा; वाकलेले खांब आणि लोंबकळणाऱ्या तारांमुळे शेतकऱ्यांचे जीवित धोक्यात
सेलू | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या वेळेस सिंगल फेज लाईन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मागील वर्षी घेतला आहे. या त्यानुसार सेलू तालुक्यातील काही सर्कलमध्ये सिंगल फेज लाईन सुरू करण्यात आली असली, तरी चिखलठाणा सर्कल मधील खेड्यांमध्ये मात्र अद्यापही हा पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. ऑक्टोबर २०२५ पासून या भागातील शेतकरी सातत्याने मागणी करत असूनही महावितरण कार्यालयाकडून या न्याय्य मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सेलू तालुका दबाव गटाने केला आहे. या संदर्भात दबाव गटाच्या वतीने महावितरणच्या उपअभियंत्यांना २३ जून २०२६ रोजी एक सविस्तर निवेदन देऊन तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या संपूर्ण परिसरात खरीप हंगामातील पेरणीचे दिवस सुरू आहेत. पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतामध्ये जावे लागते. ग्रामीण भागात आणि शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर अनेक शेतकरी कुटुंब आखाड्यावर वास्तव्यास असतात. पावसाळ्याच्या दिवसांत शेतात सतत साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा वावर वाढतो, ज्यामुळे मानवी जीविताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी आखाड्यांवर सिंगल फेज वीज उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. जर या पावसाळ्यात वेळेवर वीज पुरवठा सुरू झाला नाही, तर शेतकऱ्यांसमोर प्रचंड अडचणी निर्माण होणार आहेत.
या गंभीर समस्येसोबतच तालुक्यातील ग्रामीण भागात मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे रखडल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेले आहेत, तर काही खांब खाली पडलेले आहेत. मुख्य रस्त्यांवर आणि शेतात विजेच्या जिवंत तारा लोंबकळत असल्यामुळे शेतकऱ्यांसह जनावरांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करणे गरजेचे असताना महावितरण कार्यालय याबाबतीत फारसे गंभीर दिसत नसल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली आहे. महावितरणच्या या बेजबाबदारपणामुळे भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनावर राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
सेलू तालुका दबाव गटाने महावितरणला दिलेल्या या निवेदनात प्रामुख्याने दोन मागण्या केल्या आहेत. यामध्ये चिखलठाणा सर्कलमध्ये तात्काळ सिंगल फेज लाईन कार्यान्वित करणे आणि संपूर्ण तालुक्यात विशेष मोहीम राबवून वाकलेले खांब सरळ करून लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करणे समाविष्ट आहे. जर या मागण्यांवर प्रशासनाने तात्काळ सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर येत्या १५ जुलै २०२६ रोजी सेलू येथील महावितरण कार्यालयासमोर सर्व शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर अॅड. श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश अण्णा चव्हाळ, राजेंद्र केवारे, विलास रोडगे, गुलाब पौळ, आबासाहेब भुजबळ, सतिश काकडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.





