बळीराजाला मोठा दिलासा; हवामान विभागाकडून शनिवारपर्यंत यलो अलर्ट
परभणी : दीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी, २४ जून रोजी सकाळपासून परभणी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना तसेच पावसाच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सायंकाळीही पावसाची रीपरीप सुरू होती. सकाळी दहाच्या सुमारास परभणी शहरासह सेलू व अन्य ठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे. कुठे हलका ते मध्यम, तर कुठे जोरदार सरी बरसल्या. मान्सूनची वाटचाल मोठ्या गतीने सुरू असून परभणी जिल्ह्यात बुधवारी, २४ जून रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील शनिवार, २७ जूनरोजी पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि पशुपालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. नागरिकांनी विजा कडकडत असताना झाडांखाली आश्रय घेऊ नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत काळजी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.





