हाताशी आलेले केळीचे पीक उद्ध्वस्त, पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील तरुण शेतकऱ्याचा आक्रोश; शासनाकडे मदतीची मागणी
पाथरी, दि. १४ : पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील तरुण शेतकरी राजेश माणिकराव घुंबरे यांच्या केळीच्या बागेचे वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. १२ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास झालेल्या प्रचंड वादळ आणि विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसाने हाताशी आलेले केळीचे पीक काही क्षणांत भुईसपाट केले. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
केळी हे नगदी पीक असल्याने राजेश यांनी वर्षभर रात्रंदिवस काबाडकष्ट करून ही बाग फुलवली होती. यंदा बाजारात केळीला चांगला भाव असल्याने बँक कर्ज फिटेल आणि मुलांच्या शिक्षणासह कुटुंबाच्या अडचणी दूर होतील, अशी आशा त्यांना होती. मात्र, पीक कापणीच्या अगदी काही दिवस आधी निसर्गाने घाला घातला. वादळामुळे फळांनी लगडलेली झाडे मुळासकट उन्मळून पडली, तर तयार झालेले घड चिखलात मिसळले.
या परिसरात केळीसोबतच पपई आणि भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने शासनाकडे मदतीची याचना केली आहे. शासनाने आणि पीकविमा कंपन्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. एक वर्षाची मेहनत डोळ्यादेखत मातीमोल झाल्याने संबंधित शेतकरी सध्या अत्यंत हतबल झाला आहे.
“हे फक्त आर्थिक नुकसान नाही, माझ्या स्वप्नांची राख झाली” उध्वस्त झालेल्या बागेकडे पाहत राजेश ढसाढसा रडत म्हणाले, “वादळी वाऱ्यामुळे झालेले केळी पिकाचे नुकसान हे केवळ आर्थिक नुकसान नसून माझ्या वर्षभराच्या परिश्रमांचे आणि स्वप्नांचे नुकसान आहे. एका क्षणात सगळं संपलं. आता कर्ज कसं फेडायचं? मुलांच्या तोंडाला काय घास भरवायचा? हा प्रश्न मला खातोय.”





