वैचारिक, सामाजिक आणि करुणेचा त्रिवेणी संगम म्हणजे अहिल्याबाई होळकर : प्रा. दादासाहेब बोंबले
सेलू (प्रतिनिधी) : अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यात वैचारिक स्पष्टता, सामाजिक बांधिलकी आणि करुणा दिसून येते. दुष्काळ, सामाजिक अन्याय, स्त्रियांची तत्कालीन व्यवस्था आणि दलितांचे दुःख याविषयी त्यांनी व्यक्त केलेली चिंता त्या काळातील संवेदनशील समाजसुधारकाचे दर्शन घडवते. त्यांचे विचार हा त्या काळाचा सामाजिक आरसा असून त्यातून प्रखर मानवतावाद स्पष्टपणे व्यक्त होतो, असे प्रतिपादन प्रा. दादासाहेब बोंबले यांनी केले.
सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.पुढे बोलताना प्रा. बोंबले म्हणाले की, शिक्षणाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता, अज्ञानाविरुद्धचा संघर्ष, श्रमाचे मोल आणि आत्मसन्मान यासारख्या विषयांवर अहिल्याबाईंनी प्रभावी आणि थेट भाषेत आपले मत मांडले. त्या वंचित बहुजन आणि स्त्री घटकांचे दुःख नेहमी दृष्टिगोचर करीत असत. अहिल्याबाईंचे चरित्र वाचले तर हृदय पिळवटून आल्याशिवाय राहत नाही, एवढ्या हळव्या आणि संवेदनशील मनाच्या त्या होत्या.या वेळी प्रा. के. डी. वाघमारे यांनी देखील अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनप्रवासातील विविध प्रेरक प्रसंग उपस्थितांसमोर मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनंत मोगल यांनी केले, तर आभार माधव गव्हाणे यांनी मानले. या अभिवादन कार्यक्रमास डॉ. शरद ठाकर, रेवणआप्पा साळेगावकर, यशवंत वजीर, संपतराव झोडगावकर, रामचंद्र गजमल आदींची प्रमुख उपस्थिती होती.





