तहसीलदारांचा सातबारा दुरुस्तीचा महत्त्वपूर्ण आदेश; संजय आडे यांच्या पाठपुराव्याला यश
जिंतूर : सेलू तालुक्यातील मौजे नरसापूर येथील गट क्रमांक २६ संदर्भातील प्रलंबित महसूल प्रकरणात अखेर संबंधित कुटुंबाला न्याय मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय रामराव आडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सेलूच्या तहसीलदार यांनी १३ जुलै २०२६ रोजी आदेश पारित करून सातबारा व फेरफार नोंदीमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणात उपविभागीय अधिकारी, सेलू यांनी १६ डिसेंबर २०२२ रोजी आदेश पारित केला होता. त्या आदेशानुसार नरसापूर येथील गट क्रमांक २६ मधील १ हेक्टर ०० आर क्षेत्राबाबत झालेला फेरफार क्रमांक १०८८ (दिनांक १६ जानेवारी २०२०) रद्द करून मयत शेषराव शंकर गडदे यांच्या नावाची नोंद पूर्ववत करणे अपेक्षित होते. मात्र, अंमलबजावणीला विलंब होत असल्याने संजय रामराव आडे यांनी महसूल प्रशासनाकडे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.प्रकरणात सुनावणी घेऊन मूळ अभिलेख, ७/१२ उतारे व फेरफार नोंदींची तपासणी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम १५५ अन्वये संगणकीकृत ७/१२ मध्ये दुरुस्तीचे निर्देश दिले. आदेशानुसार विविध खातेदारांच्या नावावरील क्षेत्रात घट करून मयत शेषराव शंकर गडदे यांच्या नावावर नोंद करण्याची कार्यवाही केली जाणार असून, ऑनलाइन फेरफार घेऊन दुरुस्ती तात्काळ करण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
“अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महसूल नोंदी दुरुस्त होणे गरजेचे होते. प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मयत शेषराव गडदे यांच्या कुटुंबाला अखेर त्यांचा हक्क आणि न्याय मिळाला आहे.”— संजय रामराव आडे, सामाजिक कार्यकर्ते
विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन जिंतूर (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील विजय...