१४ सप्टेंबर पासून गणेशोत्सव, बँड पथक, सजावटीसाठी मंडळांची तयारी सुरू, १९ दिवस उशिराने आगमन, १२ दिवस मुक्काम
वाशिम : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे विशेष महत्त्व आहे ,श्रावण या पवित्र महिन्यानंतर भाद्रपद महिन्यात चौथ्या दिवसापासून गणपती उत्सवाला प्रारंभ होतो, एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणपती उत्सवाची मात्र आत्तापासूनच लगबग सुरू असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिकमास महिना वाढल्यामुळे यंदा १९ दिवस उशिरा गणपती बाप्पाचे आगमन होणार असले तरी गणपती मंडळे, बँडपथक , ढोल ताशे बुकिंग, सजावटीसाठी सरसावले असून मूर्तिकारही बाप्पांच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवत आहे.
गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो.त्यानुसार गणपती उत्सवाला १४ सप्टेंबर (सोमवार) पासून सुरुवात होणार असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी गणपती बाप्पा १९ दिवस उशिरा विराजमान होतील. या दिवशी गणेशाची पूजा केली जाईल; तर गौरी-गणपती विसर्जन हे १९ सप्टेंबर २०२६ रोजी होणार. तर गणपती विसर्जन (अनंत चतुर्दशी) २५ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.म्हणजेच १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर १२ व्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे.
यावर्षी बाप्पांची मूर्ती बनविण्याची लगबग अखेरच्या टप्प्यात असून त्यामुळे मूर्ती कारागिरांनाही अधिक वेळ मिळाला आहे ,मागील वर्षी २७ ऑगस्टला गणेश उत्सवाला सुरुवात झाली होती तर ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी होती, यावर्षी मात्र बारा दिवस गणरायाचा मुक्काम राहणार असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाप्पाचे १९ दिवस उशिरा आगमन होणार असले तरी आतापासूनच मूर्तिकार ,गणपती मंडळे तयारीला लागले असून मूर्तींची बुकिंग होऊन पोहोच केली जात आहे.बाहेरील राज्यातील मूर्तिकार मूर्ती बनविण्यासाठी महाराष्ट्रात आल्याने स्थानिक कारागिरांना त्याचा फटका बसत आहे.
गणेश चतुर्थी महत्त्व
गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने भक्ताला बुद्धी, समृद्धी व सौभाग्य प्राप्त होते, असे मानले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेशोत्सव सुरू होतो. हा उत्सव १०,१२ दिवस चालतो. या उत्सवात गणेशाची विधिवत पूजा केल्यास शुभफल प्राप्त होते.देशभर गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, पण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. यात काही दिवसातच गणेश मंडळात सजावटीचे लगबग सुरु होणार आहे, गणेशभक्त ११,१२ दिवस गणपती बाप्पाची आरती, भजन, कीर्तनात दंगून जाण्यास सज्ज झाले आहेत. गणेशाची भक्तीभावाने पूजा करण्यास उत्सुक आहेत. मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याने अर्थात मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या खर्चात वाढ झाल्याने मूर्ती विक्री मध्ये ही वाढ झाली आहे .कलर सहित कच्च्या मालाचे भाव वाढल्याने मूर्तीमध्येही भाव वाढ करावी लागत आहे ,सध्या बाहेरगावच्या मूर्तीची बुकिंग पोहोच केली जात असून काही मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जात आहे.




