राज्यात ‘पशुधन विमा योजना’ लागू, जनावरांच्या मृत्यूवर मिळणार 80 हजारांपर्यंत मदत
देशनिष्ठ , प्रतिनिधी, वाशिम : राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय पशुधन अभियाना’अंतर्गत राज्यामध्ये ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यास राज्य शासनाने नुकतीच प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पशुपालकांना आता मोठा आधार मिळणार असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या दृष्टीने शासनाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
या योजनेबाबत सविस्तर माहिती देताना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, या योजनेमुळे पशुपालकांना मोठे आर्थिक संरक्षण मिळणार आहे. भविष्यात अपघात, कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा एखाद्या रोगामुळे पशुधनाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, सरकारकडून या योजनेंतर्गत संबंधित शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाईल. यामुळे संकटाच्या काळात पशुपालकांचे होणारे मोठे आर्थिक नुकसान टळेल आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल.
या योजनेअंतर्गत नेमक्या कोणत्या जनावरांचा विमा उतरवता येईल, याबाबतही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार, देशी आणि संकरित दुधाळ गायी, म्हशी, बैल, रेडे, तसेच शेळ्या व मेंढ्या या जनावरांना विम्याचे संरक्षण मिळणार आहे. नियमांनुसार, प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त 10 जनावरांसाठीच या अनुदानित विम्याचा लाभ घेता येईल. मात्र, एखाद्या पशुपालकाकडे 10 पेक्षा अधिक जनावरे असल्यास, त्यापुढील अतिरिक्त जनावरांच्या विम्याचा संपूर्ण हप्ता संबंधित शेतकऱ्याला स्वतः भरावा लागणार आहे.
पशुधनानुसार मिळणारी आर्थिक मदत
या योजनेअंतर्गत जनावरांच्या प्रकारानुसार नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. दुधाळ म्हैस आणि रेडा यांच्या मृत्यूवर सर्वाधिक म्हणजेच 80,000 रुपयांची मदत मिळेल. तसेच, दुधाळ गाय आणि बैल यांच्यासाठी 70,000 रुपयांची भरपाई दिली जाईल. याव्यतिरिक्त शेळी किंवा मेंढी दगावल्यास पशुपालकांना शासनाकडून 7,000 रुपयांचे आर्थिक संरक्षण मिळणार आहे.
विमा कालावधी आणि प्रीमियमचे दर
पशुपालकांना त्यांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार 1, 2 किंवा 3 वर्षांसाठी विमा काढण्याची लवचिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेनुसार या विम्याचे प्रीमियम दर निश्चित करण्यात आले असून, एका वर्षासाठी 4.30 टक्के, दोन वर्षांसाठी 7.50 टक्के, तर तीन वर्षांच्या विम्यासाठी 10.50 टक्के दराने हप्ता (प्रीमियम) भरावा लागेल.





