धनंजय चौधरी जिल्ह्यात १२ वा, तर मधुर कुलकर्णी २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण; गुणवंतांचे सर्व स्तरांतून कौतुक
सेलू/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. या परीक्षेत इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत धनंजय चौधरी याने २४४ गुण मिळवून जिल्ह्यात १२ वा क्रमांक पटकावला आहे. तसेच मधुर कुलकर्णी याने २३२ गुण मिळवून जिल्ह्यात २१ वा, काव्या मरेवार हिने २२२ गुण मिळवून जिल्ह्यात ४१ वी, श्रेयस मुपडे याने २१० गुण मिळवून जिल्ह्यात ७५ वा, तर शुभ्रा मुळी हिने २०२ गुण मिळवून जिल्ह्यात ९८ वी येण्याचा बहुमान मिळवला असून हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत. यासोबतच इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत समर्थ पवार याने २१४ गुण मिळवून जिल्ह्यात ८४ वा क्रमांक मिळवत शिष्यवृत्ती पटकावली आहे.
इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना रागिणी जकाते, काशिनाथ पांचाळ आणि चंद्रकांत कव्हळे यांचे मार्गदर्शन लाभले. तर ८ वीच्या शिष्यवृत्तीसाठी विनोद मंडलिक, विजय चौधरी, शंकर राऊत आणि अनिकेत भिलेगावकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमांचे हे यश असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, उपाध्यक्षा ज्योतीताई ठाकूर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, सहकार्यवाह अमरनाथ खुर्पे, संस्था प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे, स्थानिक समितीचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर, शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी आणि मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




