सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विश्वस्त मंडळाचा निर्णय
परभणी : मानवत तालुक्यातील कोल्हा जवळील यशवाडी येथील श्री त्रिमूर्ती जागृत हनुमान मंदिर परिसरात निर्माणाधीन असलेल्या मंदिराच्या सभा मंडपाचा डोम (घुमट) अपघाताने कोसळल्याची दुर्घटना गेल्या शनिवारी, २० जून रोजी घडली. यामध्ये पाच भाविकांचा मृत्यू झाला होता, तर १६ जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुढील काही दिवस दर्शनासाठी मंदिर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी संस्थान (कोल्हा) येथील समस्त विश्वस्त मंडळींनी जाहीर आवाहन प्रसिद्ध केले आहे. मंदिर परिसरात झालेल्या अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पुढील काही दिवस भाविकांसाठी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, ज्या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे किंवा जो भाग बंदिस्त करण्यात आला आहे, अशा धोकादायक ठिकाणी कोणीही प्रवेश करू नये. मंदिर प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.





