कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा
मुंबई, दि. २८ : भारतीय हवामान विभागाने २७ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सर्व जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत:
- घाट परिसरात लहान-मोठ्या दरडी कोसळण्याची आणि ‘फ्लॅश फ्लड’चा (Flash Flood) धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नद्यांच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी.
- जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवावेत.
- शहरी सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करावेत आणि कमी उंचीच्या भागांचे निरीक्षण करून कार्यवाही करावी.
- धोकादायक आणि जुन्या इमारतींवर CSSR (Community Search and Rescue) च्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- वीज आणि रस्ते पायाभूत सुविधांसाठी दुरुस्ती पथक, साखळी आरे व फीडर संरक्षण युनिट तैनात करावे.
- कोकण व वरच्या खोऱ्यातील मध्यम धरणांतील पाणीसाठा आणि विसर्ग याचा नियमित आढावा घ्यावा.
- आपत्तीपूर्व सूचना SMS, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांद्वारे त्वरित प्रसारित कराव्यात.
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी स्वतःही सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.
- अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.
- धोकादायक ठिकाणी (उदा. पूरप्रवण क्षेत्रात) जाणे टाळावे.
- वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे.
- पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी आणि आवश्यक असल्यास स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे.
- पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे.
- नदी-नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास रस्ता ओलांडू नये.
आपत्कालीन संपर्क क्रमांक
संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत: धाराशीव: ०२४७२-२२७३०१, बीड: ०२४४२-२९९२९९, परभणी: ०२४५२-२२६४००, लातूर: ०२३८२-२२०२०४, रत्नागिरी: ७०५७२२२३३, सिंधुदुर्ग: ०२३६२-२२८८४७, पुणे: ९३७०९६००६१, सोलापूर: ०२१७-२७३१०१२, अहिल्यानगर: ०२४१-२३२३८४४, नांदेड: ०२४६२-२३५०७७, रायगड: ८२७५१५२३६३, पालघर: ०२५२५-२९७४७४, ठाणे: ९३७२३३८८२७, सातारा: ०२१६२-२३२३४९, मुंबई शहर आणि उपनगर: १९१६/०२२-६९४०३३४४. मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र २४x७ कार्यरत असून त्याचे संपर्क क्रमांक: ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९, ९३२१५८७१४३ हे आहेत.





