जनजीवन विस्कळीत, शेतीचे मोठे नुकसान
पालम ( शिवाजी शिंदे) : पालम शहरासह तालुक्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी ढगफुटीजन्य अतिवृष्टीने थैमान घातले आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या-ओढ्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. शनिवारी पालम तालुक्यात अतिवृष्टी झाली. रविवारी, २८ सप्टेंबररोजी सकाळीप्राप्त अहवालानुसार पालम तालुक्यात पालम ८१.३, चाटोरी ६६, बनवस ६७.३, तर पेट शिवनी तब्बल १२६.३ मिलीमीटर पावसाची नोंंद झाली आहे.
जनजीवनावर परिणाम : स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांच्या घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी शिरले होते. यामुळे घरातील गहू, तांदूळ, ज्वारी यांसारखे धान्य भिजून निकामी झाले, तर काही वाहून गेले. अचानक आलेल्या या आसमानी संकटामुळे शेतकरी आणि पूरबाधित नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान : मागील चोवीस तासांपासून तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात अक्षरशः सागराचे दृश्य दिसत होते. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या महापुरात शेतकऱ्यांचे बैल, गाई, म्हशी, शेळ्या आणि कोंबड्या यांसारखे पाळीव प्राणीही वाहून गेल्याची माहिती आहे. शनिवारी झालेल्या पावसात पालम येथे १५३.३, चाटोरी येथे १४३, बनस येथे १३९.८, पेठ शिवणी येथे १११.५ आणि राव राजूर येथे ११३.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
संपर्क तुटला, मदतीची मागणी : या महापुरामुळे शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवरील नद्यांना पूर आल्याने तालुक्यातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे शासनाने पूरग्रस्त शेतकरी आणि घरात पाणी शिरलेल्या नागरिकांना तातडीने भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.





