पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा पुढाकार
परभणी : सेलू आणि मानवत तालुक्यातील ५४ गावांना तसेच जिंतूर तालुक्यातील गावांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील गावांना पुर्णा प्रकल्पातून पाणी देण्यासाठीही महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
पुर्णा प्रकल्पामध्ये येलदरी (३३ टीएमसी क्षमता) व सिध्देश्वर (८.८६ टीएमसी क्षमता) ही दोन धरणे आहेत. हा प्रकल्प १ जानेवारी १९६९ पासून सिंचनासाठी सुरू झाला. पालकमंत्री बोर्डीकर यांनी जिंतूर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागासाठी येलदरी धरणातून पाणी उपसा योजना राबवून सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी शासन दरबारी आग्रही मागणी लावून धरली आहे. यामध्ये केहाळ, सावंगी, हिवरखेडा, चारठाणा, भोसी, वस्सा, ब्राम्हणगावसह अनेक गावांचा समावेश आहे.
पालकमंत्री बोर्डीकर यांच्या पाठपुराव्याने १९ सप्टेंबर २०२५ रोजी जलसंपदा मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत उपसा योजनेला गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीतील आदेशानुसार, शासन स्तरावरून एजन्सी नेमून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या योजनेमुळे सुमारे २०० गावे आणि ३००० शेतकरी यांना फायदा होऊन १० हजार एकर जमीन सिंचनाखाली येण्याची अपेक्षा आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या ०३ जानेवारी २०२५ च्या पत्रानुसार ही प्रस्तावित उपसा सिंचन योजना हाती घेणे शक्य आहे. मात्र, नवीन योजना प्रस्तावित करण्यापूर्वी पुर्णा प्रकल्पाचे फेर नियोजन आवश्यक असल्याने, लवकरच शासन मान्यतेस्तव प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कोरडवाहू भागातील पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र बदलण्याचा मार्ग मोकळा होईल, असे पालकमंत्री बोर्डीकर यांनी कळविले आहे.





