प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू : घसरून पाण्यात पडल्याने दुर्घटना
सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील राजेवाडी ते वालूर मार्गावरील दुधना नदीच्या पुलावरून दोन जण घसरून पाण्यात पडल्याची घटना मंगळवारी घडली. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेले असून घटनास्थळी तहसीलदार तसेच पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत. या अपघातात छबुराव जावळे (वय ५० वर्षे, रा. गुळखंड, ता. सेलू) आणि मारुती रामभाऊ हरकळ (वय ४५ वर्षे, रा. वालूर, ता. सेलू) असे दोन जण बेपत्ता झाले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रशासनाकडून तत्काळ शोधमोहीम हाती घेण्यात आली असून पथके नदीपात्रात शोधकार्य करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून निम्नदुधना धरणाच्या आठ दरवाजातून नदीपात्रात विसर्ग सुरू होता. मंगळवारी दुपारी तो दोन दरवाजे बंद करून कमी करण्यात आला. विसर्गामुळे दुधना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. राजवाडी पुलावरून पाणी वाहत आहे. नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.





