रेल्वे प्रवासातून माणसातील माणुसकी जागृत होते – रविकिरण गंभीरे
सेलू : प्रवाशांना रेल्वे सेवेतील बदलांनुसार स्वतःला अपडेट करून प्रवासाचा आनंद घ्यावा, असे मत नांदेड विभागाचे मुख्य तिकिट निरीक्षक प्रदीप जोहिरे यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात १८ ऑगस्टरोजी आयोजित ‘एक दिवस एक पुस्तक’ या कार्यक्रमात अविनाथ वैद्य यांच्या ” रेल्वेची रंजक सफर ” या पुस्तकावर आयोजित चर्चेत ते बोलत होते.
या वेळी रविकिरण गंभीरे यांनी पुस्तकावर विस्तृत चर्चा मांडली. ते म्हणाले की, रेल्वे ही सामाजिक अभिसरणाचे केंद्र असून, प्रवासातून माणसातील माणुसकी जपायला शिकता येते. रेल्वे हे समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारे, कमी पैशात चांगला प्रवास घडवणारे आणि कोणताही भेदभाव न करता प्रवाशांना समान मानणारे साधन आहे. रेल्वे प्रवासात विविध स्वभावाच्या लोकांशी संवाद साधल्यामुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळते, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात शिवनारायण मालाणी यांनी रेल्वे प्रवासी संघटनेच्या कामांची माहिती देत प्रवाशांनी आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमात प्रमिला धापसे लिखित ‘हाफ मेंटल’ या कादंबरीचे प्रकाशन महेश खारकर, चंद्रशेखर मुळावेकर, हेमंतराव आडळकर, डॉ. शरद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक एन.एम. देशपांडे यांनी केले, सूत्रसंचालन मौजम शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ए.टी. देशमुख यांनी केले. यावेळी ए.टी. मदने, प्रा. राजाराम झोडगे, प्रा. अनंत मोगल, सुरेश अंभईकर, विशाल काला, शामसुंदर भुतडा, अजित मंडलिक, रवींद्र कुलकर्णी यांच्यासह अनेक श्रोते उपस्थित होते.





