राजवाडी जवळील दुधना नदीत वाहून गेल्याची दुर्घटना; दुसऱ्याचा शोध सुरूच
महसूल, पोलिस, आपत्कालीन व्यवस्थापन व अग्निशमन दलाचे प्रयत्न, ग्रामस्थांचेही सहकार्य
सेलू : सेलू तालुक्यातील राजवाडी पुलावरून दुधना नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोघांपैकी मारोती रामभाऊ हरकळ (वय ५०, रा. वालूर) यांचा मृतदेह बुधवारी, २० ऑगस्टरोजी सकाळी ९ वाजता डुघरा–कवडधन शिवारात आढळून आला. दरम्यान, छब्बुराव श्रीरंगराव जावळे (वय ४५, रा. गुळखंड) यांचा शोध पथकाव्दारे बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू होता. मात्र, अद्याप ते आढळून आले नाहीत. गुरूवारी सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
निम्न दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दुधना नदीला भीषण पूर आला आहे. राजवाडी पुलावरून धोकादायक वेगाने वाहणारे पाणी पार करण्याचा प्रयत्न दुचाकीस्वारांनी केला; मात्र दुर्दैवाने ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. प्रत्यक्षदर्शींनी बचावाचे प्रयत्न केले, पण तेही निष्फळ ठरले. महसूल, पोलिस आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथकाने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली. आसपासच्या गावकऱ्यांनीही सहकार्य केले. या मोहिमेत उपविभागीय पोलिस अधिकारी दीपककुमार वाघमारे, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार, मंडळ अधिकारी सारिका हेगडे, वालूर पोलिस चौकीचे मुकेश बुधवंत, गुलाब राठोड, लक्ष्मण जीवने आदी अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून देखरेख करत होते. तसेच पूर्णा, मानवत आणि पाथरी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून मदतकार्य केले.






