सेलू : सेलू तालुक्यातील राजवाडी गावाजवळ दुधना नदीवरील पुलाची दुरवस्था झाली असून, तो जीर्ण व कमी उंचीचा आहे. या पुलाला संरक्षक कठडे नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, या पुलाला तात्काळ संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या पावसामुळे नदीला आलेल्या पुरात या पुलावरून वाहून गेल्याने दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुलावर संरक्षक कठडे असते, तर त्यांचा जीव वाचला असता, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. याच घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवार, २० ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले.
या निवेदनात, पुलाला तात्काळ संरक्षक कठडे बसवण्याची तसेच पुलाची उंची कमी असल्यामुळे नवीन पूल बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर २८ ऑगस्टपासून पुलावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
या निवेदनावर शेळके, अक्षय सोळंके, रामेश्वर वाघमारे, परमेश्वर आवटे, वैभव मोरे, आनंता सूर्यवंशी, गणेश शेवाळे, गौरव बर्वे, आकाश इघवे आणि रवनीत सिंग यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




