पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती, परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा
परभणी : जून-२०२५ ते ऑगस्ट-२०२५ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागातील सातारा व सांगली जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी महसूल व वन विभागाने १८ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार १३६ कोटी ३ लाख ९९ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. या निधीपैकी परभणी जिल्ह्यातील २ लाख ३८ हजार ५३० नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १२८ कोटी ५५ लाख ३८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
जून, जुलै व ऑगस्ट-२०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. शासनाने नुकसानीची तात्काळ दखल घेऊन परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल १२८ कोटी रुपयांच्या निधीची तातडीने मदत जाहीर केल्याबद्दल पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करून मदत उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
शासन निर्णयानुसार, जून-२०२५ ते ऑगस्ट-२०२५ या कालावधीत अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांची संख्या, बाधित क्षेत्र (हेक्टर) आणि मंजूर निधी यांचा महिनानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे: जून-२०२५ मध्ये १ शेतकरी (बाधित क्षेत्र ०.४० हेक्टर) असून मंजूर निधी ९ हजार रुपये आहे; जुलै-२०२५ मध्ये ८७,११७ शेतकरी (बाधित क्षेत्र ६०,७३९.०२ हेक्टर) असून मंजूर निधी ५१ कोटी ६४ लाख २२ हजार रुपये आहे; तर ऑगस्ट-२०२५ मध्ये १,५१,४१२ शेतकरी (बाधित क्षेत्र ९०,४८३.२० हेक्टर) असून मंजूर निधी ७६ कोटी ९१ लाख ७ हजार रुपये आहे. मंजूर झालेला निधी डीबीटी पोर्टलद्वारे थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात येणार आहे.





