उपजिल्हाधिकाऱ्यांना काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निवेदन
सेलू : जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २५ या महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी, पडझड आणि ढगफुटीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद अशा खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, सेलू तालुका ‘ओला दुष्काळ’ म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. यासंबंधीचे निवेदन पक्षांच्यावतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार श्री. नारायण पिंपळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, अतिवृष्टीमुळे नद्या, नाले आणि ओढ्याकाठची माती व पिके वाहून गेली आहेत. अनेक घरांची पडझड झाली असून, गुरे-ढोरे व इतर पशुधनाचेही नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतीची कामे थांबली आहेत आणि कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पिके खराब झाली आहेत. या संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे, सेलू तालुक्याला ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर सेलू तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हेमंतराव आडळकर, कॉम्रेड उद्धवराव पौळ, कॉम्रेड रामकृष्ण शेरे, माजी नगराध्यक्ष श्री. पवन आडळकर, विनोद तरटे, दत्तराव आंधळे, कॉम्रेड दत्तू सिंग ठाकूर, माजी नगरसेवक श्री. रहीम पठाण, मुश्ताक रब्बानी, बाळासाहेब जोगदंड, शेख दिलावर, शेख साजिद, नृसिंह हरणे, अफजल ईशानी, सचिन राऊत, इरफान लाला, सुदर्शन शेरे, अतीक कुरेशी, आणि मधुकर नाईकनवरे व दिगंबर पौळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





