पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना शेतकऱ्यांचे निवेदन
सेलू (परभणी) : जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, मोरेगाव महसूल मंडळात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी २०,००० रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी मोरेगाव येथील ग्रामस्थांनी राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.१६ सप्टेंबर २०२५ पासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. त्यातच २३ सप्टेंबर रोजी दुधना नदीला आलेल्या पुरामुळे आणि दुधना प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या संदर्भात शाम मगर, महादेव मगर, प्रकाश चव्हाळ, मदन चट्टे, मुकुंद टेकाळे, योगेश काकडे, तुकाराम नाटकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी एकत्र येत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना निवेदन दिले. कर्ज काढून, उसने पैसे घेऊन पिके उभी केली असताना ती नैसर्गिक आपत्तीमुळे वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, त्याच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना अनेक गावकरी उपस्थित होते.





