माजी आमदार विजयराव भांबळे यांची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
परभणी : अतिवृष्टीमध्ये संपूर्ण जिंतूर व सेलू तालुक्यातील मंडळांचा तसेच वगळलेल्या वालूर व कुपटा मंडळांचा सामावेश करून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानाची मदत करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे माजी आमदार विजयराव भांबळे व शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली आहे. चालू वर्षातील जुलै, ऑगष्ट, सप्टेंबर- २०२५ या तीन महिन्यांमध्ये जिंतूर व सेलू तालुक्यात सततचा पाऊस, ढगफुटी व अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, हळद, ऊस व फळबाग ई. पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अक्षरशः पीके पाण्यात जाऊन सडून गेली आहेत. शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी यावर प्रचंड खर्च केलेला आहे. हे सर्व नुकसान बघून शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी घोषित करून निधी मंजूर केला आहे, परंतु, वालूर व कुपटा ही दोन मंडळे अतिवृष्टीमधून वगळली आहेत. त्यामुळे या मंडळातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. या दोन्ही मंडळाचा अतिवृष्टीमध्ये समाविष्ट करून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदानाची मदत करावी, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी विश्वनाथ राठोड, अजय चौधरी, मुरलीधर मते, बाळासाहेब घुगे, अभिनय राऊत, विठ्ठल घोगरे, कृष्णकांत देशमुख, लक्ष्मण बुधवंत, केशवराव बुधवंत, गणेशराव इलग, चंद्रकांत गाडेकर, खंडेराव आघाव, रामेश्वर जावळे, अर्जुन वजीर, शंकर जाधव, कैलास महाराज देशमुख, जिवन आवटे, शरदराव अंभूरे, अभिलाष दुधगावकर, अभिजित भांबळे, राहुल घुले, अविनाश मस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




