एसटी आरक्षणासाठी सरकारला २९ सप्टेंबरचा अल्टिमेटम, सेलू येथील तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
सेलू : धनगर समाजाला संविधानिक एसटी (ST) आरक्षण तात्काळ लागू करावे, या मागणीसाठी समाज आक्रमक झाला असून त्यांनी येत्या २९ सप्टेंबर २०२५ रोजी सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात २६ सप्टेंबर रोजी सेलू् येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांनी निवेदन स्वीकारले.या आंदोलनाची सुरुवात जालना येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाने झाली आहे, परंतु सरकारने त्याची दखल न घेतल्याने समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत.धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जालना येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ पासून दीपक बोऱ्हाडे आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, उपोषणाला दहा दिवस होऊनही शासनाचा कोणताही प्रशासकीय अधिकारी किंवा मंत्री यांनी याची साधी दखलही घेतलेली नाही. सरकारच्या या उदासीन भूमिकेमुळे समाजबांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.या तीव्र भावना लक्षात घेऊन, धनगर समाजाने सेलू उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करून २६ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन केले. या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, २९/०९/२०२५ रोजी सर्व सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल आणि यापुढेही विविध आंदोलनांच्या माध्यमातून लढा सुरूच राहील. सरकारने जालना येथील उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन धनगर समाजाला त्वरित न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर भीमराव हारके, भागवत दळवे, माऊली चौरे, रामचंद्र शिंदे, प्रकाशराव मुळे, आनंद डोईफोडे, विजय दळवे, दामोधर दळवे, रमेश धापसे, सोपान हारके, सुदाम रोकडे, गोविंदराव शिंदे, अशोक खताळ, पांडुरंग रोकडे, तुकाराम महाजन आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.





