पालकमंत्री बोर्डीकर यांचा अतिवृष्टीबाधीत शेतकऱ्यांना धीर : निकषात बदल करून जास्त मदत देण्यास सरकार सकारात्मक; प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश
परभणी : अलीकडील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी २६ सप्टटेंबर रोजी शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. रामपुरी, थार, हटकरवाडी, ब्रम्हपुरी, साळापुरी, धारासुर, सायळा या गावांमध्ये त्यांनी भेट दिली. ‘तुम्ही एकटे नाही, शासन पाठीशी’: ओसाड पडलेली शेती आणि वाया गेलेली पिके पाहून पालकमंत्र्यांच्या डोळ्यांतही पाणी आले. “या संकटात तुम्ही एकटे नाहीत, सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत शासनाला ठाऊक आहे, त्यांची मेहनत वाया जाऊ दिली जाणार नाही. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यास शासन कटिबद्ध आहे. निकषात बदल करून शेतकऱ्यांना अधिकची मदत कशी मिळेल, यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाधित शेतकऱ्याला सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन देऊन पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे पूर्ण करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यावेळी पाथरीच्या उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, परभणीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार, संबंधित अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कायमस्वरूपी उपायांवर भर : पालकमंत्री
- रामपुरी व थार: मानवत तालुक्यातील रामपुरी येथील गोदावरी नदीच्या पुरामुळे मच्छीमारांच्या जाळ्यांचे झालेले नुकसान आणि शेतीत साचलेल्या गाळाची नोंद पंचनाम्यात घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. तसेच, गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, असे पालकमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.
- थार व वांगी: या गावातील शेतकऱ्यांच्या कॅनॉल मार्गे रस्ता व नदीच्या पुलाची उंची वाढवण्याच्या मागणीवर, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या आणि कॅनॉलच्या उंची वाढवण्याचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.
- आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सौम्यकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला असून, त्याची टेंडर प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
- नदीकाठच्या शेतांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. नदी काठच्या शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
- साळापुरी येथे बोलताना, परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद घेतली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
- सायळा: गंगाखेड तालुक्यातील सायळा शिवारात गोदावरी व इंद्रायणी नदीच्या बॅकवॉटरमुळे होणाऱ्या नुकसानीची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. सायळा येथील पुलाची उंची वाढवण्याचे व धसाडी येथील पांदण रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याच्या मागणीवर तातडीने उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.





