‘अहल्या’ खंडकाव्य म्हणजे स्त्रीवादावरचे प्रभावी भाष्य : ज्येष्ठ समीक्षक अश्विनी धोंगडे
पुणे : ‘अहल्या’ हे खंडकाव्य हिंदीचा अनुवाद नसून मराठीतच लिहिल्यासारखे वाटावे इतके उत्तम आणि सूचक आहे. हे काव्य म्हणजे स्त्रीवादावरचे भाष्य असल्याची भावना ज्येष्ठ समीक्षक अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास वसेकर यांच्या ‘अहल्या’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनावेळी अध्यक्षपदावरून धोंगडे बोलत होत्या. ‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन १२ जानेवारी रोजी करण्यात आले.
यानिमित्ताने धोंगडे यांनी ‘अहल्या’ या शब्दाचा नेमका अर्थ उलगडून तिचा जीवनप्रवास सांगितला. त्याचबरोबर तिच्या आयुष्यातल्या अवस्था काव्यात कशा उमटल्या आहेत, ते स्पष्ट केले. धोंगडे पुढे म्हणाल्या की, एका पुरुषाने हे काव्य लिहूनही स्त्रीची वेदना आणि तिचे मन ओळी-ओळींमधून व्यक्त झाले आहे. मूळ हिंदी कवी बलदेव वंशी आणि ज्यांनी मराठीत हे खंडकाव्य आणले ते विश्वास वसेकर यांनी ‘स्त्रीची वेदना मांडायला स्त्रीच हवी’ हे समीकरण खोटे पाडले आहे. या काव्यसंग्रहातील निसर्गाचे वर्णनही विलोभनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ‘गुरू’ कादंबरीला पुरस्कार मिळाल्याबद्दल लेखक नितीन कोत्तापल्ले यांचा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. वाचकांच्या प्रतिनिधी म्हणून साहित्यिक वंदना बोकील-कुलकर्णी यांना पुस्तकाची प्रत देण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. मीनाक्षी पाटील, सुनीताराजे पवार, डॉ. वर्षा तोडमल यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. नितीन कोत्तापल्ले यांनी आभार मानले.
या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कवी विश्वास वसेकर व प्रकाशक नितीन कोत्तापल्ले हे पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत प्रेक्षकांमध्ये बसून होते. व्यासपीठावर फक्त वक्ते आणि अध्यक्ष उपस्थित होते. ‘अहल्या’ हे स्त्रीवादावर भाष्य करणारे पुस्तक असल्याने सर्व महिलांना त्यांनी मनोगत व्यक्त करण्यास सांगितले आणि स्वतः श्रोत्याची भूमिका बजावली. लेखक आणि प्रकाशकांच्या या वेगळ्या कृतीचे सर्व महिला वक्त्यांनी आवर्जून कौतुक केले.





