ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
परभणी : परीक्षेची भीती न बाळगता, तणावमुक्त राहून आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टीकोनातून परीक्षेला सामोरे जावे. आई-वडील व गुरुजनांचे संस्कार जपत सातत्यपूर्ण परिश्रम केल्यास यश निश्चित मिळते. परीक्षेतूनच आपले आयुष्य घडत असते, असे प्रतिपादन व्याख्याते तथा समुपदेशक राहुल गिरी यांनी यांनी केले.
धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या माध्यमिक विभागात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षेला जाताना’ या विशेष समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री.गिरी बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के होते. सचिव प्राचार्य. शितल सोनटक्के, समन्वयक आणि विभागप्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्ञानसाधना सूरसागर संचाने स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविकात शितल सोनटक्के यांनी दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य दिशा व प्रेरणा मिळावी, यासाठी या समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.अध्यक्षीय भाषणात प्रा.सोनटक्के यांनी नियमित, सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध अभ्यास केल्यास घवघवीत यश मिळते, असा विश्वास व्यक्त केला व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन पी. एस. खंदारे यांनी केले, तर समन्वयक आर. जी. पोले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





