सेलूच्या मुख्याधिकार्यांना शिवा संघटनेचे निवेदन; पर्यायी जागेची किंवा दुरुस्तीची मागणी
सेलू : येथील सर्वे नंबर ३३ मधील सातबारा नोंदणीनुसार ८० आर जमीन वीरशैव लिंगायत समाजासाठी वीरशैव मोक्षधाम दफनभूमी म्हणून राखीव आहे. मात्र, सध्या या दफनभूमीची अत्यंत दुरावस्था झाली असून शहरातून व कत्तलखान्याकडून येणारे नाल्याचे पाणी थेट दफनभूमीत घुसत आहे. यामुळे अंत्यसंस्कार करणे जिकीरीचे बनले असून प्रेताची विटंबना होत असल्याची तक्रार शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत संघटनेने सेलू नगर परिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन दिले आहे. शहरात वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या सुमारे ४ ते ५ हजार असून त्यांच्यासाठी ही जागा दफनभूमी म्हणून देण्यात आली आहे. परंतु, सांडपाण्यामुळे या जागेत सर्वत्र दलदल झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डा खोदल्यास लगेच पाणी निघत असल्याने अंत्यविधी करणे अशक्य झाले आहे. गेल्या १५ वर्षांपासून समाजाच्या वतीने तत्कालीन प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला जात आहे, मात्र केवळ आश्वासनापलीकडे काहीही ठोस कारवाई झालेली नाही.निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की, नवीन पर्यायी जागा मिळेपर्यंत सध्याची जागा पूर्णपणे समतल करून द्यावी. तसेच दोन्ही नाल्यांचे पिंचिंग करून स्मशानभूमीत पाणी घुसणार नाही, याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. यासोबतच अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, लाईट आणि हातपंपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. वालूर रोडकडून स्मशानभूमीकडे येणाऱ्या जुन्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून तो रस्ता मोकळा करावा आणि संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.निवेदन देतेवेळी नगरसेवक कपिल फुलारी, गणेश सवणे, मनीष कदम यांच्यासह शिवा संघटनेचे उपजिल्हाप्रमुख शिवकुमार नावाडे, तालुकाप्रमुख निजलिंगआप्पा तरवडगे, सोशल मीडिया प्रमुख प्रदीप डफूरे, गुरुबसआप्पा पंचगले, बबनआप्पा झमकडे, गणेश गोरे, रामा कटारे, अमोल पाचलेगावकर आदी उपस्थित होते. उपमुख्याधिकारी चव्हाण यांनी हे निवेदन स्वीकारले.





