खाकीतील मैत्रीचा ‘स्मृतीगंध’: तत्कालीन पोलीस अधीक्षक खंडेराव शिंदे यांच्या उपस्थितीत ‘स्नेह मेळावा’ उत्साहात

सेलू (प्रतिनिधी) दहावी-बारावीच्या मित्रांचे स्नेहसंमेलन आपण नेहमीच पाहतो, परंतु परभणीमध्ये पोलीस दलातील एकाच बॅचच्या ५० सेवानिवृत्त मित्रांनी तब्बल २७ वर्षांनंतर एकत्र येत मैत्रीचा एक आगळावेगळा ‘स्मृतीगंध’ दरवळला. १९८६-८७ च्या परभणी पोलीस भरती बॅचचा हा ऐतिहासिक स्नेह मेळावा २४ फेब्रुवारी रोजी पाथरी रोडवरील सरदेशपांडे हुरडा पार्टी परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, ज्यांच्या कार्यकाळात ही भरती झाली, ते तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक खंडेराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती.
कृतज्ञतेचा सोहळा आणि भारावलेले क्षण
कार्यक्रमाच्या प्रारंभी, या बॅचमधील जे सहकारी आज हयात नाहीत, त्यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर खंडेराव शिंदे यांचा सपत्नीक वस्त्ररूपी आहेर, भव्य पुष्पहार आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या लाडक्या अधिकाऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आयोजक शिवाजीराव कोटे म्हणाले, “प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत पारदर्शक पद्धतीने शिंदे साहेबांनी ही भरती प्रक्रिया राबवली. त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातील तरुणांना पोलीस दलात संधी मिळाली. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठीच या सोहळ्याचे आयोजन केले आहे.” यावेळी खंडेराव शिंदे हे देखील भारावून गेले होते. ते म्हणाले, “माझ्या कार्यकाळात अनेक भरती प्रक्रिया झाल्या, पण इतक्या वर्षांनंतर कुणीतरी अशी आठवण ठेवून कृतज्ञता व्यक्त करणे, हे माझ्यासाठी अनपेक्षित आणि आयुष्यातील पहिलाच अनुभव आहे. चांगल्या कामाची पावती उशिरा का होईना मिळतेच, याचे हे जिवंत उदाहरण आहे.”
मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक माधव लोकुरवार होते. विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक गोपीनाथ सरोदे, गंगाधर टाकरज, सय्यद मुसा, जळबाजी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना जळबाजी गायकवाड यांनी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून पोलीस बांधवांच्या अडचणी सोडवण्यावर भर दिला. सायंकाळच्या सत्रात गोपीनाथ सरोदे यांनीही उपस्थित पोलीस मित्रांना निवृत्तीनंतरच्या आरोग्याविषयी आणि संघटनात्मक शक्तीविषयी मार्गदर्शन केले.
आठवणींचा उजाळा आणि मैत्रीची शिदोरी
दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात हुरडा पार्टी आणि स्नेहभोजनाचा आनंद घेत सर्वांनी आपल्या पोलीस सेवेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक वर्षांनंतर भेटल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. उपस्थित सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कानेकर यांनी केले, तर आभार किशन राठोड यांनी मानले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी राजकुमार पुंडगे, गंगाधर लेंगुळे, दगडूबा जिवने, गणेश कदम, शेख मेहबूब, अशोक वैद्य यांच्यासह आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.





