सेलूतील व्यंकटेश्वर प्रतिष्ठानचा इशारा, सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन
सेलू (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेली वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, तातडीने गतिरोधक बसवण्यात यावे, अशी मागणी श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले असून, योग्य पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
शहरातील रायगड कॉर्नर ते परभणी रोड, नूतन महाविद्यालय ते बाबासाहेब मंदिर रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका हे तिन्ही मार्ग अत्यंत रहदारीचे आहेत. या मार्गांवर ४ शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग आणि मोठी नागरी वसाहत आहे. त्यामुळे येथे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा वावर असतो. मात्र, अनेक दुचाकी व चारचाकी वाहनधारक या रस्त्यावरून अत्यंत बेदरकारपणे आणि वेगाने वाहने चालवत असल्याचे चित्र आहे.
या वेगवान वाहनांमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, त्यात काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. या भागात विद्यार्थी मोठ्या संख्येने सायकलवरून ये-जा करतात. भरधाव वाहनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर, संबंधित तिन्ही मार्गांवर तात्काळ गतिरोधक बसवावेत, अशी मागणी प्रतिष्ठानने केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र जन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी जयसिंग शेळके, गणेश शेवाळे, विनोद धापसे, कृष्णा पडघन, अक्षय सोळंके, पवन धुमाळ, आकाश इघवे, करण ढवळे आदि उपस्थित होते.




