सेलूतील अलंकापुरीनगरीत चैतन्यदायी वातावरण
सेलू : अलंकापुरीनगरीत रोज सकाळी ७.३० ते १० या वेळेत सामुहिक ज्ञानेश्वरी पारायण होत आहे. यामध्ये २१ हजारांहून अधिक महिला व पुरुष भाविक ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करत आहेत. यामुळे परिसरात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे.
संतांनी समतेची शिकवण दिली : रामराव महाराज हेंडगे
सर्व संतांनी समतेचा संदेश दिला. समर्पण भावनेने कर्म करायला शिकविले. माणसासोबत माणसासारखे वागावे हे सांगितले. असे प्रतिपादन वेदांताचार्य रामराव हेंडगे महाराज यांनी केले. शनिवारी सकाळी आयोजित हरी किर्तन सेवेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ” एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते. जीवन सर्वार्थाने सार्थकी लावायचे असेल तर आपण ज्ञानेश्वरी पारायण केले पाहिजे. सर्व संतांची वचने अंगीकारले पाहिजेत. तरच आपण जीवनात सुखी होऊ शकतो. ” असेही ते म्हणाले.
धार्मिक पुस्तकांची मोठी विक्री
अलंकापुरीनगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी सांगता पारायण सोहळा स्थळी असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीतील पेठभाबळगाव ता.पाथरी येथील मानाचा अश्व आणि पालखीचेही दर्शन भाविक घेत आहेत. सोबतच पुस्तक दालनातून ज्ञानेश्वरी ग्रंथ, संत तुकाराम गाथा आणि विविध धार्मिक पुस्तकांची मोठ्या प्रमाणात भाविक खरेदी करत आहेत.





