अतिरिक्त संपत्तीचा विनियोग सत्कार्यासाठी व्हावा : स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन इंग्लिश शाळेचा नामविस्तार “बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल सेलू” असा करण्यात आला आहे. स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांच्या हस्ते आणि बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक व नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी, १५ मार्च २०२६ रोजी हा सोहळा उत्साहात पार पडला.
व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाशचंद बिनायके तसेच सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना महाराजांनी नूतन इंग्लिश स्कूलचे नवीन नाव बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल सेलू असे झाल्याची अधिकृत घोषणा केली. शाळेच्या या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामीजींनी शाळेच्या परिसरात प्रवेश करताना तेथील प्रसन्न वातावरण आणि विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध प्रतिकृतींची प्रशंसा केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र, पर्यावरणाचे रक्षण, अपघाताच्या वेळी मदत करणे आणि सामाजिक गरजा अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आविष्काराने आपण भारावून गेलो असल्याचे त्यांनी नमूद केले. या कल्पकतेबद्दल त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.
स्वामीजी पुढे म्हणाले की, ही शाळा आता सीबीएसई अभ्यासक्रमानुसार चालणार असून, यामुळे ग्रामीण भागातील या शाळेला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त होणार आहे. सेलू सारख्या लहान गावातून एका शाळेने घेतलेली ही झेप मराठवाड्यासाठी अभिमानास्पद आहे. हा केवळ नामविस्तार नसून संस्थेचा कार्यविस्तार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी महाराजांनी बाहेती आणि बिहाणी या दोन्ही परिवारांच्या दातृत्वाचा गौरव केला. संपत्ती मिळवणे हे जीवनाचे यश असले तरी, मिळवलेली संपत्ती योग्य ठिकाणी खर्च करणे हेच जीवनाचे खरे सार्थक आहे, असे सांगून त्यांनी दोन्ही कुटुंबांचे कौतुक केले. या संस्थेत एकाच कुटुंबातील ४ पिढ्यांनी शिक्षण घेणे, ही या संस्थेच्या कार्याची पावती असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी स्वामीजींचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच महर्षी वेद व्यास प्रतिष्ठानला शाळेतर्फे ५० हजार रूपये देणगीचा धनादेश स्वामीजींकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मराठवाडा नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया व फुलकंवर लोया यांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य कोठेकर यांनी केले. शाळेला सीबीएसई दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच बाहेती व बिहाणी यांनी प्रत्येकी ३१ लाखांची देणगी दिली. त्याद्वारे इंग्लिश स्कूलमध्ये भौतिक सुविधांसह सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी सर्व संचालक आणि शिक्षक योगदान देत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
ज्ञान आणि धन हे वाटल्याने वाढते असे सांगत त्यांनी अतिरिक्त संपत्तीचा विनियोग सत्कार्यासाठी करण्याचे आवाहन केले. शाळेच्या विकासासाठी आर्थिक योगदानाबद्दल सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी, जयप्रकाशजी बिहाणी, किरण बिहाणी, विजय बिहाणी, कमला बिहाणी तसेच शिवनारायण बाहेती, विणा बाहेती, नंदकिशोर बाहेती, कांचन बाहेती, रामवल्लभ बाहेती व रश्मी बाहेती यांचा तसेच यांचा स्वामीजींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जयप्रकाश बिहाणी व नंदकिशोर बाहेती यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.लोया यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन स्वप्ना काळे यांनी केले. भुजंग देऊळगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्राचार्य नरेंद्र पाटील, प्रणिता सोलापूरे, सिमा सोनपावले, ज्योती जोशी आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास डी. के. देशपांडे, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे व राजेश गुप्ता पदाधिकारी, सदस्य तसेच पालक, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सक्षम पिढीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आवश्यक : राधेश्याम चांडक
याच कार्यक्रमात बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी रविवारी, १५ मार्च २०२६ रोजी शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. महाराष्ट्राने देशाला शिक्षणाची दिशा दाखवली परंतु आज हेच राज्य शैक्षणिक गुणवत्तेत देशात सातव्या क्रमांकावर फेकले गेले आहे ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या समाजात वाढलेली कॉपी संस्कृती आणि पैशांच्या जोरावर मिळवल्या जाणाऱ्या पदव्यांमुळे पदवीधर तरुणांना साधे अर्जही लिहिता येत नाहीत. अशा गुणवत्ताहीन शिक्षणामुळे तरुण केवळ घोषणाबाजी करण्यापुरते मर्यादित राहत असून स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडत आहेत.बाहेरच्या राज्यातील शिक्षक गुणवत्तेच्या जोरावर लाखो रुपये पगार घेतात तर आपल्याकडे केवळ पगारासाठी मोठ्या रकमा देऊन नोकरी मिळवण्याकडे कल वाढला आहे. शिक्षकांनी स्वतःच्या कौशल्यात सुधारणा करून विद्यार्थी घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे असे त्यांनी सांगितले. शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी राजसत्ता आणि धर्मसत्तेने गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंतीही त्यांनी या प्रसंगी केली. केवळ इमारती उभ्या करून शिक्षण पूर्ण होत नाही तर त्यात दमदार गुणवत्ता असणे आवश्यक असल्याचे विचार त्यांनी मांडले.





