सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध
सेलू : शहरातील आध्यात्मिक वातावरणात चैतन्य निर्माण करणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सांगता सोहळ्यात रविवारी सकाळी हभप सोपान महाराज शास्त्री सानप यांचे कीर्तन झाले. ज्ञानेश्वरीचे महत्त्व आणि भक्तीचा महिमा विशद करत शास्त्रीजींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नसून तो जीवनात आचरणात आणण्यासाठी आहे, असे प्रतिपादन हभप सोपान महाराज शास्त्री यांनी यावेळी केले.
त्यांनी आपल्या कीर्तनातून वारकरी संप्रदायाची थोरवी सांगतानाच समाजप्रबोधनावर भर दिला. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन आणि व्यवस्थापन केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. ज्ञानेश्वरी कंठस्थ असणे ही मोठी साधना असून अशा साधकांमुळेच आपली संस्कृती टिकून असल्याचे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी काढले. या मंगल प्रसंगी संत पूजनाचे यजमानपद माधवराव काकडे आणि गोविंदजी डालिया यांनी भूषवले.





