पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे : भावी पिढीला संस्कार देणारा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा
सेलू : वडीलधाऱ्या माणसांना अध्यात्माची आवड असतेच पण पुढच्या पिढीलाही अध्यात्माची गोडी लावणारा हा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा आहे. शिस्तबद्ध नियोजनात संपन्न होणाऱ्या या सोहळ्यातून प्रत्येक जण समाधान घेऊन जातो आहे असे प्रतिपादन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी बुधवार दि. १८ रोजी फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना केले.
अलंकापुरीनगरीत आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात पुढे बोलताना पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे म्हणाल्या की आजच्या काळात नामस्मरणाची गोडी असल्याशिवाय आपल्या मनाला आणि संसाराला समाधान मिळणार नाही. आपली सर्व तीर्थक्षेत्रे आणि ऊर्जाक्षेत्र विकासाची कामे शासनाने हाती घेतली आहेत. जिल्ह्यातील ३०० च्या वर असलेल्या हेमाडपंथी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी केंद्र आणि राज्याचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. नामस्मरणातून मिळणारी ऊर्जा रोजच्या जीवनातील समस्या आणि अडचणींना पार करण्याची शक्ती देते. अशा पारायण सोहळा आणि कार्यक्रमातून हे सर्व सहजशक्य होते. आपण भारतीय म्हणून एकत्र राहण्याची गरज आहे. पर्यावरण संतुलनाचे खूप मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. यादृष्टीने पारायण सांगता सोहळ्यातून दिला गेलेला प्लास्टिकमुक्तीचा संदेश खूप महत्त्वाचा आहे असेही मेघना बोर्डीकर साकोरे म्हणाल्या.
या वेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली), सावता महाराजांचे सतरावे वंशज, फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा ज्यांच्या संकल्पनेतून साकारला ते ह.भ.प. पंडित महाराज डाके, अविनाश बिहाणी, संजय साडेगावकर यांची विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. संजय पिंपळगावकर यांनी केले.





